बुधवार, ३० ऑगस्ट, २०२३

दोन सल्ले

दोन सल्ले
********
दोन तरजोडी तर कधीच करू नका
एक लग्न करताना दोन नोकरी धरताना 
तर एक  असा सल्ला मिळाला 
फुकट आम्हाला पण किती उशिरा 
अन जरी अगोदर मिळाला असता  
तरी काय पाळता आला असता ?

मिळेल ती नोकरी धरावी लागते पोट भरायला 
हजारो बेकारांच्या दुनियेत बऱ्यापैकी जगायला 
सरकारी नोकरीच एक बर असतं 
कारण कायद्याचं युनियनचं पाठबळ असतं 
काम केलं नाही झालं तरी फारसं बिघडत नसतं 
हजेरी लागली की पगाराचं चाक फिरत असतं 
प्रायव्हेट मध्ये जरा खपाव लागतं 
आणि सांभाळून राहावं लागतं 
साहेबापुढं शेपूट हलवावं लागतं
वाहवाची फुलं उधळत राहावं लागतं
*
आणि लग्नाचं म्हणाल तर 
जी आपल्याला आवडते 
तिला आपण आवडत नाही 
तर मग काय करायचं 
घरोघर किती पोहे खात फिरायचं 
शेवटी ऍडजस्टमेंट तर करावंच लागतं .
आणि समजा एखादी आवडून लग्न केलं
 तरी पुढचं काय कुणाला कळतं
शेवटी सगळ्यात संसाराचा एकच सूत्र असतं 
त्यातून कसं तरी पार व्हायचं असतं 
आणि चक्र तर सगळीकडे सारखच असतं 
घरदार मुलंबाळं वाढवणं खेळवणं 
रुसवारुसवी फुगाफुगी तणातणी 
ओढाताण शिक्षण आजारपण 
अन मग शेवटी म्हातारपण 
तर मग हे सल्ले सल्ल्यासाठी ठीक आहेत 
पण अशी कितीतरी सुभाषित सल्ले
आम्ही फक्त फळ्यावरच वाचतो
आणि फळ्यावरच ठेवून देतो

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

मंगळवार, २९ ऑगस्ट, २०२३

माकड


माकड
******
एक माकड फिरते गरगर 
वरती खाली या इमारतीवर 
भला दांडगा तो हुप्या गब्बर 
घुसतो घरात चुकवून नजर 
डल्ला मारतो कधी फळावर 
नेतो चोरून खाऊ बरोबर 
लाल पिंकट मुख रे त्याचे 
भाव तयावर सदा भुकेचे 
जवळ जाताच भय दाखवतो 
भुवया ताणून दात विचकतो 
म्हणती बाबा आला हनुमान 
गेला त्याचा तो नैवेद्य घेऊन 
म्हणते बायको अति वैतागून 
तो गेला वेडपट रोपे उपटून
भय कुतूहल डोळ्यात उमटले 
टकमक टकमक पाहतात मुले 
अरे गेले कुठे पण ते वन खाते 
झाडाखाली कुण्या निजले वाटते
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

सोमवार, २८ ऑगस्ट, २०२३

उगाच


उगाच
*****

अशी खोल डोळ्यात पाहू नको उगाच 
बुडेल मी तुझ्यात जगेल मी उगाच ॥ १

अशी येत मनात गाऊ नको उगाच 
भिजून मी सुरात धडाडेल उगाच ॥ २

कशाला ग देतेस निमंत्रण उगाच 
बोभाटून होईल गाव गोळा उगाच ॥ ३

नको नको पैंजणे तू वाजवू उगाच 
होती फितूर पाय तोल जाईल उगाच ॥ ४

कळली न मजला  दुनियादारी कधीच 
कशाला मग खेळू डाव हरला उगाच ॥ ५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

रविवार, २७ ऑगस्ट, २०२३

माऊली

माऊलीस
********
थकलेल्या बाळाला 
घेई कडेवर आई 
चालवत नाही आता 
थोडे तुझे बळ देई ॥१
किती तुडवली वाट 
काटे मोडले पायात 
सारे सोसले पाहिले 
तुझा धरूनिया हात ॥२
नाही आडवाटे गेली 
माझी इवली पाऊले 
तुझे शब्द माझ्या जीवी 
गीत जगण्याचे झाले ॥३
झाली  ओढाताण कुठे 
बोल साहिले विखारी 
नाही जाऊ दिला तोल 
तुज जपले जिव्हारी ॥४
आता बहुत हे झाले 
त्राण माझे ग सरले 
येई धावून तू माये 
करी करुणा कृपाळे ॥५
तुझ्या शब्द पाळण्यात 
मज जोजव निजव
स्वप्न रेखिले ओवीत 
माझ्या डोळ्यांना दाखव ॥६
मग निजेल मी शांत 
तुझ्या प्रेमळ मिठीत 
सारे विसरून दुःख 
जन्म जीवन जगत ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

सर्प यज्ञ

सर्प यज्ञ 
******
जीवनाचे अत्यंत रसरशीत चैतन्यदायी 
तरीही भयावह रूप असते नागराजाचे 
त्याचा तो एकच फुत्कार
उमटतो शहारे अंगावर 
त्याच्या दंशभयाने या देहात  
वाहतात भयाचे कितीतरी लोट   
तरीही तो जेव्हा फडा उभारतो 
आणि डोलू लागतो कुठे थोडा दूरवर 
मंत्रमुग्ध होते नजर 
विस्तारतात बाहुल्या अन् 
विसरतो आपण आपले भान 

तो कधी काळा कधी पिवळा 
कधी ठिपक्यांचा तर कधी आकड्याचा 
कधी स्वतःच्याच जातीचा भक्षक 
किंग कोब्रा असतो
त्याचे प्रत्येक रूप 
असते भीषण सुंदर 
*
तो दिसत असतो जंगलात
 माळरानात शेतात निर्जन परिसरात 
एकांतप्रित तापट संन्याश्यागत 

त्याचे ते विषदंत असतात 
साधन शिकारीचे संरक्षणाचे 
पण  डसतात  कधीकधी 
मनुष्याला कळत नकळत 
अन् या त्याच्या  प्रतिक्षिप्त कृतीने 
घाबरून चिडून 
माणूस करू लागतो
संहार सा-याच सर्पजातीचा 
तो सर्प यज्ञ 
जो कधीच संपला नाहीत
अन् घडतच आहे विनाश
अश्या हजारो देखण्या जीवांचा 

माणसाला कळत नाही 
की तक्षकाय स्वाहा :
सोबत इंद्राय स्वाहा : नाही तर 
मनुष्याय स्वाहा : हेच घडू शकते .
कारण साखळीतील एक कडी तुटणे 
म्हणजेच साखळी तुटणे असते.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 



 

शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३

बुद्ध होत नाही तोवर

बुद्ध होत नाही तोवर 
***************"
निबीड भयानक अंधकारात 
संकटात दुःखात होता वाताहात 
आशेचा एक किरण शोधत असतो जीव 
दुःख संकट निराशा अपयश 
कुणालाच नको असते 
पण यशाचाच प्रतिध्वनी अपयश असते 
आणि सुखाचेच प्रतिबिंब दुःख असते 
सदा सगळ्यांनाच सदैव दुःख मिळत नसते 
किंवा सुखही मिळत नसते 

पण असतात काही अभागी जीव 
ज्यांच्या जीवनातील दुःखाची वाट 
दैन्याचा उतार सरता सरत नाही  

दुःखाचा जन्म मुळातच दारिद्र्यात आहे 
दारिद्र्याचा जन्म अज्ञानात आहे 
स्वतःचे अज्ञान स्वतःच्या क्षमतेबद्दल अज्ञान 
जगाचे अज्ञान जीवाबद्दलचे अज्ञान 
मनुष्यत्वा बद्दलचे अज्ञान
.
भौतिक सुखाच्या मर्यादा जाणून 
त्या मिळवणे ही एक पायरी आहे 
मनुष्य जीवनाची 
पण बहुतेक जीवनातील निरर्थकता 
एकूणच जीवनाची क्षणिकता तोच तोचपणा 
हे दुःखाचे कारण असू शकते का ?
म्हटले तर असते म्हटले तर नसते 
त्याच्याकडे कोण कसे पाहते 
त्यावर हे अवलंबून असते 

पण खरे दुःख आहे ते गमावण्याचे 
धन ज्ञान परिवार पद प्रतिष्ठा हरवण्याचे 
आयुष्यभर केलेली कष्टाची मिळकत 
उभारलेला डोलारा तो पडण्याची शक्यता 
हे जाणण्यात आहे 
हे सारे नेते मरण एका क्षणात 
अस्तित्वाच्या खुणा ही मिटवत 
हे नसणं मानसिक दुःखाचे कारण आहे 

अर्थात ज्याच्याकडे जास्त 
त्याची आसक्ती जास्त त्याचे दुःखही जास्त 
म्हणूनच संत महात्मे गातात 
निरासक्तीचे त्यागाचे गोडवे 
पण तेही मनाचे ट्रेनिंगच असते 
विवेकाने आणलेले वैराग्य असते 
.
दुःखाच्या निराकरणाचे मार्ग 
प्रत्येक जण शोधत असतो 
आपल्या कृतीप्रमाणे आपल्या समजेनुसार
पण हे अटळ सत्य आहे की 
दुःख कुणालाच सोडत नाही 
तुम्हाला दुःखासवे  जगावेच लागते 
कधी त्याला स्वीकारत 
कधी त्याचाशी तडजोड करत 
कधी हुशारीने शिताफीने 
जमेल तेवढे त्याला दूर ठेवत

पण ते येतच राहते 
अचानक संकटाच्या रूपाने 
आणि आपले व्याज घेतच राहते 
प्रत्येक जीवाकडून 
जोवर तुम्ही बुद्ध होत नाही तोवर

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

गुरुवार, २४ ऑगस्ट, २०२३

येई आता


येई आता
*******
दिलेस जगणे हे मज दत्ता 
काय ते हाता होते माझ्या ॥१
कुठे कसा अन् काय मी होतो 
जरी न जाणतो दयाघना ॥२
तूच उचलले गगनी ठेवले 
लाड पुरविले जगती या ॥३
परि ती खेळणी मजला देऊन 
ठेवीसी रिझवून दूरवरी ॥ ४
खेळ उमजला हा आता मजला 
बहुत चालला जगती या ॥ ५
थांबव सारे अन तू येरे 
उचलुनि ने रे मज आता ॥ ६
जगतो विक्रांत तुज आठवत
येई अवधूत दत्तात्रेया ॥ ७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३

शिव्या कृपा


शिव्या
*********
शिव्याविन पापा कैसी हो आटणी
देवाची ही देणी  कृपामय  ॥१

कळल्यावाचून जगती जगता 
पाप घडे हाता ऋषीच्याही ॥२

तर मग आम्ही मातीचे पुतळे
जळी विरघळे स्पर्शे होता ॥३

पडू देरे शिव्या व्हावी रे हेलना 
भेटी दयाघना त्वरे व्हाया ॥४

परी राहो मन तेधवा ही स्थिर
अवघा स्वीकार प्रसाद हा ॥५

किती रे शिणसी बापा अवधूता 
निर्मळ विक्रांता करावया ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .





सोमवार, २१ ऑगस्ट, २०२३

पुरस्कार


 सना पंडीत यांच्या FB पोस्ट वरून सुचलेले 

 १ पुरस्कार म्हणजे काय रे भाऊ ?
: - अरे ते तुला माहित नाही का जे देणाऱ्याला द्यायचे नसते पण घेणाऱ्याला घ्यायचे असते .
अन देणाऱ्याला ज्याला द्यायचे असते त्याला देता येत नसूनही  ज्याला दिले त्याला हसून दाखवायच असते .
२ म्हणजे भिक का रे भाऊ ?

: - नाही रे 'ती गोष्ट आपल्या आपल्यातच वाटायची असते ,कधी तुला घे तर कधी मला दे असं म्हणत मिळवायची असते .
३ म्हणजे आहेर का रे भाऊ . ?

: - छे तुला तर काहीच कळत नाही .
जी दिल्याने पेपरात छापून येते सगळीकडे नाव होते .
४: - म्हणजे चोरी का रे भाऊ ?

: - छे आता याला कसे समजावे .
जी दिली असता फक्त चार लोकांनाच कळते बाकीच्यांना काहीच माहित नसते . रस्त्यावरच्या भाजीवाल्याला वडापाववाल्याला आणि फेरीवाल्याला तर कळतच नसते .
: म्हणजे करमणूक का रे भाऊ . ? 
😊🥴😄😁

रविवार, २० ऑगस्ट, २०२३

क्षणभर

क्षणभर
*******
हे सारेच क्षणभर 
हे सारेच कणभर 
पण असू दे रे 
अन हसू दे रे 
श्वासात प्राण भरून 
डोळ्यात चंद्र ठेवून 
जगु दे रे
हे सारेच सरणार 
हात रिते राहणार 
उद्याचे काय रे 
कोणी पाहिले रे 
आज हात उभारून 
ओठात गाणे घेवून 
नाचू दे रे 

उद्या हे नसणार 
स्वप्न तुझे तुटणार 
स्वप्न तुटू दे रे 
भान हरू दे रे 
जीवना मिठी देऊन 
स्वप्न डोळ्यात भरून
निजू दे रे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

शनिवार, १९ ऑगस्ट, २०२३

फुकटचे धन

फुकटचे धन
********
फुकटाच्या धनाचा त्या
लोकांना या लोभ का रे 
नरका जाती-पितर 
दिसत त्या नाही का रे ॥१
पापाचे ते घडे भरे 
चढे रास वर वर 
पुन्हा पुन्हा जन्मा येणे 
किती दुःख तळमळ ॥२
गरीबीचे दुःख नको 
व्यथा नको फाटक्यात 
हळुवार पेटवा रे 
देव दीप अंतरात ॥३
दोन घास पोटाला का 
दयाघन देत नाही 
मरणाचे भय का रे ?
जर ते सुटत नाही ॥४
कोटी कोटी जमव रे 
साथ काही येत नाही 
सारे जरी ठाव तुला 
तरी का वळत नाही ॥ ५
चार घास दोन वेळा 
राम नाम घेत खायी
विक्रांत सुखात नांदे 
आनंदाला अंत नाही ॥ ६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

वळचणीचे पाणी

वळचणीचे पाणी
************

निरोपवाचून कितीदा दारी तुझ्या मी आलो
अन् ओलांडल्याविनाच उंबरा परत मी गेलो , ॥१

कसलीही ओढ असे मजला नच कळते 
आंधळेच डोळे परी तुला शोधत मी गेलो ॥२

नसशील जर आत तू  काय मी रे करावे 
साठविल्या तपा माझ्या जपत मी गेलो ॥३

मोडू नये स्वप्न खुळे कुणाचेच इथे कधी 
पाहताच जाग येवू चादर ओढत मी गेलो ॥४

बरसला पाऊस असा वळचणीस पाणी आले धजले ना पाऊल भिजाया कोरडा मी राहीलो ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०२३

गाणी

गाणी
******
तुझ्यासाठी आकाशाची फुले किती सजवावी  
मनातील गाणी माझ्या किती किती उधळावी ॥१

ठाव नसे तुला जरी तुझ्यासाठी येती सरी 
मिटलेल्या वादळाची वाट सरे तुझ्या दारी ॥२

खिडकीत डोळे तुझे किती कुणी न्याहाळले 
पसरल्या हातावरी ओले स्पर्श थरारले ॥३

वेडे हसू उमलले चोरूनिया कुणी नेले 
कवितेत विखरून किती त्यांचे शब्द केले ॥४

नाही नाही तुज मुळी काहीच ते ठाव नाही 
खळीमध्ये अडकले शब्द तुझे माझे नाही ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३

देव भुरळ

देव भुरळ
*****
कैसी ही भुरळ पडे या मनाला 
देव गणेशाला पाहतांना ॥
पदोपदी माया जाणवते त्याची 
सावली सुखाची अंगावरी ॥
रेखीव आकार प्रकट ॐकार 
सुख डोळ्यावर पांघरते ॥
प्रेम वर्षावात करावे कौतुक .
पायी वा मस्तक ठेवावे त्या ॥
कळेनासे होते चाकाटून मन 
गहीवर दाटून येतो उरी ॥
होते वेडी कुडी दुर्वांची ती जुडी
पडे मौन घडी अंतरात ॥
देतोस जगता काय अन किती 
तयाची गणती नाही कुठे ॥
विक्रांत मागतो तुझ्या पायी सेवा 
हृदयात देवा सदा रहा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

सॉफ्टवेअर

सॉफ्टवेअर
*********
जन्मापासून मरेपर्यंत मेंदूचे हे सॉफ्टवेअर 
कसे बदलत जाते अपडेट होत जाते 
हे एक कोडेच आहे ?
लहानपणी खेळात रमणारे 
तरुणपणी रमणीच्या मागे धावणारे 
प्रौढ वयात कुटुंब सांभाळणारे 
अन वार्धक्यात मरणाला घाबरणारे 
हे सॉफ्टवेअर जसजसे वय बदलते 
वातावरण बदलते कार्यक्षमता बदलते 
तसतसे बदलत जाते 
अन आपण सॉफ्टवेअर आहोत 
याचा त्याला पत्ताही नसतो 
त्याचे अपडेटिंग कोण करतो 
त्याला माहीत नसते 
या जगातील प्रत्येक माणसाची 
प्रतिक्रिया सारखीच का असते 
सगळ्यांची सुख दुःख राग द्वेष स्वार्थ 
अप्पलपोटीपणा सारखाच का असतो 
भाषा वेष भूगोल वेगळा असूनही 
एकमेकांना कधीही न पाहूनही 

आपल्यात काही फॅमिली इन बिल्ड 
सॉफ्टवेअर असतात ते काढता येत नाही 
आई-बाबा आजोबा काका यांनी भरलेले 
वा समाजाने कोंबलेले काही वेगळे असतात 
कधी कधी ते भक्तीचे असतात 
कधी व्यापाराचे असतात 
कधी शूद्रपणाचे असतात 
धूर्तपणाचे असतात तर 
कधी मूर्खपणाचे असतात

त्यावर फॉरमॅट मारायची कुणाची इच्छाही नसते 
किंवा तो फॉरमॅट मारला जाऊ शकतो 
हे कुणाला माहीतही नसते 
माहित झाले तरी तेवढे मेहनत घेणे नसते कदाचित दुसरे सॉफ्टवेअर तरी 
वेगळे काय करणार 
ही अनाम जाणीव असेल त्यांना 
पण तो  सॉफ्टवेअरचा नियामक समायोजक 
मालक तो बिल गेट 
तो कुणालाच दिसत नाही कळत नाही 

ही जगाची समाजाची कुटुंबाची 
आणि मनाची क्लिष्ट रचना 
परस्पर व्यवहार त्यातील भावनांची ओढाताण
प्रेम मोह माया यांचा आविष्कार 
द्वेष ईर्षा तिटकारा यांचा संचार 
हे सारे यांत्रिक आहे 
मेंदूत जाणारा सिग्नल ठरवतो 
कुठले सॉफ्टवेअर वापरायचे 
आणि काय प्रतिक्रिया द्यायची ते
मग हे जीवन फक्त संवेदन आणि 
त्याला होणारी प्रतिक्रिया एवढेच आहे काय?

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

सुख


सुख
******
सुख ज्याला सुख मिळते 
तो हसतो नाचतो आणि आनंदाने ओरडतो 
पण ओसरतात ती नशा तो आवेग 
पुन्हा रिक्त हस्त होतो 
आणि पुन्हा धावू लागतो 
नव्या सुखाच्या शोधात 
सुख मिळते डोळ्यांना कानाला 
नाकाला त्वचेला आणि जिभेला 
सुख असते फक्त 
एक न्युरोकेमिकल प्रोसेस
मेंदूला का कुठे चव घेता येते 
वा गंध घेता येतो स्पर्श करता येतो 
मेंदूला पोहोचते ती 
फक्त एक संवेदना एक सिग्नल 
मेंदूला सांगितले गेले असते 
मेंदूत संग्रहित केले गेले असते 
तो तसा सिग्नल मिळताच ते सुख ठरते 
अन् आनंदाचे हार्मोन 
स्त्रवू लागतात रक्तात 
पण काही क्षणातच हरवून जातात 
सुख येते सुख जाते 

खरं तर रस रंग गंध स्पर्श यांची 
गरज असते देहाला आणि मनाला 
अस्तित्वाची निरंतरता टिकवण्यासाठी 
रोग टाळण्यासाठी 
पशुचे भय ठेवण्यासाठी
विषारी फळांचे गंधाचे कीटकांचे 
स्पर्श टाळण्यासाठी 
विषसेवन टाळण्यासाठी 
कारण या संवेदना करत असतात 
संकटांचे निराकरण जीवाचे रक्षण
या पंच ज्ञानेंद्रिया मुळे 
पण ना कळे  कुणास ठावूक
ती कधी अन् कशी झाली सुखाची साधनं 
अन मग सुरू झाली सुखाची स्पर्धा 
हव्यासाची युद्धाची स्वार्थाची विषारी मुळे
रुजली गेली खोलवर मना मनात

जर ही सुख उपभोगाची प्रक्रिया संपली 
कधी तरी कश्यानेतरी नष्ट झाली तर ?
तर हे जग खरोखर सुखी होईल का?

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३

अर्थ

अर्थ 
****
म्हटला तर अर्थ कशालाच नाही
जन्माला येण्यास जगण्यास मरण्यासही 
एक निसर्ग प्रक्रिया आहे या देह मनाची ही
उत्पत्ती स्थिती आणि लय घडवणारी 
जसे की लाखो कोट्यावधी जीव 
इथे जन्माला येतात आणि मरतात 
समुद्रकिनारी पडलेल्या शिंपल्याची गणती 
कोण करू शकणार, कोण ठेवू शकणार ?
आणि ठेवूनही काय करणार म्हणा !
नाव वैभव किती क्षणिक हास्यास्पद गोष्टी आहेत 
नाही म्हटले तरी जगतांना पोटात पडणारी आग 
ती तेवढी खरी असते आणि तेवढीच खरी असते 
वस्त्र निवाऱ्याची गरज ही
जगणे आणि जिवंत राहणे वंश सातत्य टिकवणे 
या पलीकडे प्रेरणा येतात 
तथाकथित बुद्धिमत्तेतून अन्
रक्तात पाझरणाऱ्या संप्रेरका मधून 
सेरोटोनिन डोपामिन ऍड्रीनालिन टेस्टोस्टरोन प्रोजेस्टरोन  ओक्सिटोसीन वगैरे वगैरे ..
आनंद सुख स्वप्न भीती यांचे हे इवलाले डोस 
देतात हातात टाळ, उभारतात प्रार्थना घरे 
जमवतात गर्दी शुक्रवारी रविवारी गुरुवारी 
कुणालाच कळत नसतं, पछाडल्यागत अन्
संमोहित होत सारे चालत असतात त्याच रस्त्याने
चपला वेगळ्या असतात टोप्या वेगळ्या असतात 
पण डोळे तसेच असतात मनही तीच असतात 
अन् रक्तात मुरलेली जगण्याची चाकोरीही 
ती असते कणाकणात वाहत 
जगत जगत मरत मरत पुढे पुढे सरकत 
असले हे जीवन तसे पाहिले तर 
खरंच अर्थहीन आहे.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३

उमेश परमार

उमेश परमार 
**********
परस्पर विरोधी गुणावगुणांनी 
भरलेले व्यक्तिमत्व असलेला उमेश परमार 
जीवना इतकाच मृत्यूलाही खेळ समजणारा 
सहजच पटात गेला मृत्यूच्या 
कबड्डी खेळणाऱ्या खेळाडू सारखा .
खरं तर अनेकदा त्याला 
स्पर्शून हसून हसून परत आलेला हा गडी 
या डावात मात्र, फसला कैचीत त्याच्या 
अन् परत आलाच नाही 

जीवनाच्या लाटावर स्वार झालेल्या
होडीगत तो जगत होता
हिंदकळत गरगर फिरत 
कुठे आपटत कोणावर आपटत 
कुणाला नदी पार नेत तर 
कोणाला मध्येच उतरवत 

त्याच्या आक्रमक आवाजामागे 
बेछूट देहबोलीमागे बेफिकीर वृत्तीमागे 
काय दडले असेल कोणालाच कळले नाही 
त्याचे प्रश्न आर्थिक होते का ?
सामाजिक होते का ?कौटुंबिक होते का ?
या चर्चेला आता काहीच अर्थ नाही 
कारण हे कोणीही सोडवायला गेले नाही 
आणि कुणाला सोडवता येणे नव्हते शक्यही 

मला मात्र आठवते ती रूग्णालयात 
त्याची परत येण्याची आर्जवी  विनंती 
आणि मी त्याला दिलेली संमती 
फक्त स्वत:ला बदल 
एवढी एकच अट ठेवलेली 
पण त्याचे बदलणे हे जणू 
अशक्य कोटीमधले होते 
हेही मला उमगत होते 

पण त्याने चीफ मेडिकल ऑफिसरच्या खुर्चीला 
देव मानले होते हे मला नक्कीच कळत होते 
त्याची ती श्रद्धा आणि आदर 
त्या बाहेरच्या वादळाचे अगदीच विरुद्ध रूप होते 

मला उमेश आठवता आठवता आठवू लागतात 
अनेक चेहरे उमेश सारखे 
माझ्या आजूबाजूला या रुग्णालयात वावरलेले 
आणि असेच अचानक निघून गेलेले 
जीवनाची तमा नसलेले 
भावनांच्या लाटेवर वाहणारे 
व्यसनात सुख शोधणारे 
सदैव अनुत्तरीत प्रश्न असलेले

आणि वाटते हे चेहरे या व्यक्ती 
 मूक हाका तर मारत नव्हते 
आपल्या सर्वांना आजूबाजूच्या सवंगड्यांना 
मानलेल्या मित्रांना सहकामगारांना 
त्याच्या त्या वर्तणुकीतून 
ज्या कधीच पडल्या नाहीत कानावर 
आम्हा कुणाच्याच?

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

सोडूनही देव




सोडूनही देव
********
सोडूनही देव सुटत नाही 
मोडूनही देव मोडत नाही ॥

कृष्ण सुटतो बुद्ध हरवतो
परंतु श्रद्धा तुटत नाही ॥

येशु बुद्ध कृष्ण वेगळे रे नाही
परी अट्टाहास वैरभाव देईं ॥

भट भंते पाद्री सारेच पुजारी 
मध्यस्थ माणसा लागतात बाजारी ॥

आत्म धर्म एक असे या जगाचा 
एकाच कणातून उद्गम जगताचा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

मंगळवार, ८ ऑगस्ट, २०२३

जीवना

जीवना
******
नक्षत्रांनी ठरवलेले भाग्य 
आणि ग्रहांनी मांडलेले सौख्य 
खरे असतात की नाही ठाऊक नाही 
पण जगण्याच्या अंगणात पडलेल्या  
या काचा कवड्या वेचतांना 
आणि सांभाळतांना झालेला आनंद 
तो कुठल्याही पत्रिकेत मांडता येत नाही 
ते मातीमध्ये मळलेले हात 
धुळींनी भरलेले कपडे 
किती अनमोल असतात 
हे कुठलेही जवाहरला कळत नाही 
खरंच का प्रारब्धाने भेटतात 
हे सवंगडी मित्र मैत्रिणी 
नाव गाव चेहरे वेगळे असतात 
तरीही प्रत्येकाच्या जीवनात 
बहरतात हे वर्षा ऋतू 
भक्तीशिवाय मिळणारी 
तपस्येविना फलद्रूप होणारी 
ही कुणाची कृपा असावी ..
तना मनाला निववणारा 
न मागता मिळणारा 
हा कुणाचा प्रसाद असावा ..
जीवना तू खरच सुंदर आहेस
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३

खळांची व्यंकटी .

खळांची व्यंकटी
*************
दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च।
अज्ञानं चाभिजातस्य पार्थ सम्पदमासुरीम्।।16.4।। भगवद्गीता !
पारुष्यमेव=काठिण्य अभिजातस्य = जन्मास येणे

तर ही अशी माणसं समोर येऊन उभी ठाकली तर काय करायचं ?आणि एक ते तीन श्लोकामध्ये वर्णन केलेले दैवी गुण अजून आपल्यात उतरले नाही तर काय करायचं?
जग हे त्रिगुणांनी भरलेले आहे त्यामुळे सात्विक  राजसिक तामसिक लोक ही तर भेटणारच.

तेव्हा त्या व्यक्तीचाही स्वीकार करायचा त्याच्या रागाचा, अहंकाराचा, काठिण्याचा, दर्पाचा सुद्धा. कारण त्या बिचाऱ्याला काय ठाऊक आहे तो कुठे आहे, ते जर त्याला कळते तर तो तिथे नसता ना.
सात्विक माणसाच्या केल्या गेलेल्या छळाचा प्रतिवाद सात्विक माणसाकडे नसतो तर सात्विकतेचे रक्षण करणाऱ्या परमेश्वराकडे असतो. तो त्याचे ब्रीद कधीही मोडत नाही. त्यामुळे  हा शरणागतीचा भाव घेऊन त्या परमेश्वराच्या दारात सर्वांसाठी  ज्ञानदेवांनी दिलेले पसायदान मागणे हेच आपल्या हातात असते.
जे खळांची व्‍यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो
भूता परस्परे जडो | मैत्र जीवांचे.|

डॉ.विक्रांत तिकोणे 




शनिवार, ५ ऑगस्ट, २०२३

लज्जत

लज्जत
*******

माझ्या तथाकथित 
दुःखाबद्दल  
माझ्याशी हुज्जत 
घालणाऱ्या कविता 

जेव्हा उतरतात 
संध्याकाळी खाली
माझ्या घराच्या छतातून 
दाटणाऱ्या अंधाराचा हात धरून
वा येतात स्मृतीच्या अडगळीतून 
मनाचे कवाड उघडून 
रेंगाळत दबकत धूर्तपणे 
किंवा आक्रमक आगावू पणाने 
अन् पसरु पाहतात सभोवताली 
माझे अस्तिव गिळून 

मी  त्यांना पकडतो अन्
टाकतो  बुडवून 
चहाच्या कपात 
मग पितो चवीचवीने 
हलकेच फुंकर मारत 

खरच सांगतो 
तो चहा खूपच चविष्ट असतो 

मला ठाऊक आहे 
कविताची हुज्जत कधीच 
थांबणार नाही 
आणि चहाची तलपही 
सरणार नाही

अर्थातच तोवर
सुख दुःखाला कवटाळून 
असोशीने जगणाऱ्या झिंगणाऱ्या 
जीवनाची लज्जतही
मिटणार नाही 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

काय चूक अन्

काय चुक अन ....
***********
काय चूक अन् काय बरोबर 
कुणास कधी कळते काय ?

आकाशाच्या डोक्यावर 
कोण देतो कधी पाय ?

का कधी अन असे कशाला 
प्रश्न उगा का हवे पडायला ?

आभाळ भरते पडते पाणी 
मनी उमलती उगाच गाणी 

या साऱ्याला अर्थ असतो 
ज्याला दिसतो त्याला दिसतो 

कुणा पाहुनी मन हरखते 
बोलून कुणाशी मन उमलते 

नाते नसते तरीही असते 
उगाच का मग सुख वाटते 

जगणे म्हणजे असते जगणे 
ऊन कोवळे टिपूर चांदणे 

जगून घ्यावे क्षण हातातले 
उधळीत मोती ओंजळ भरले
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

ना.धो.महानोर

ना.धो. महानोरांची गाणी
******************

ही गाणी 
पावसाची अन् रानाची 
गर्भार मातीच्या 
सृजनत्वाची 

तिच्यासारखी 
रुजलेली फुटलेली 
फाडीत अंतर 
उफाळलेली 

रानाचे चैतन्य 
रानाच्या भाषेत 
रानाच्या गंधात 
घेऊन आलेली 

ओलीचिंब झालेली 
रानाच्या गंधाने 
दरवळणारी
उत्कतेने भारावली 

ही गाणी
गावाचे दैन्य 
विद्ध शब्दात 
मांडणारी

हृदयाला भिडणारी 
काळीज पोखरणारी 
मातीच्या कुशीत 
शिरून रडणारी 

ही गाणी जेव्हा 
मी वाचली 
तेव्हा माझी नाळ 
माझ्याशी कुजबजली 
म्हणाली 

इथूनच
यायचे असते
रुजून 
या मातीचे अन् आकाशाचे
सत्व घेवून 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘

बुधवार, २ ऑगस्ट, २०२३

गरज


गरज
*****
माझिया शब्दाची तुला न गरज 
कळतेय मज दत्तात्रेय  ॥१
लिहिणे हे शब्द माझीच गरज 
कळतेय मज अवधूता ॥२
आता सरू आली शब्दाची ही रास 
लिहिण्याची आस पुन्हा पुन्हा ॥३
वाटते सोडावी आता ही लेखणी 
कृपेची मागणी अर्थशून्य ॥४
मातीच्या फुलाला गंध तो कुठला 
दोष त्या कुलाला मग कैसा ॥५
मिटून ठेवतो तुझ्या पायी वही 
फार दूर नाही होळी आता ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

होशी दत्ता

होशील दत्ता ********* कुणासाठी होशी दत्ता तू रे देव  स्वीकारशी भाव हृदयीचा ॥१ कुणासाठी होशी दत्ता तू रे बाळ  कृपाळ प्रेमळ लीलाधर...