शुक्रवार, ३१ मार्च, २०१७

|| सांभाळावे दत्तराया ||





|| सांभाळावे दत्तराया ||

तुवा ठरविले
तैसेचि घडावे
मज सांभाळावे
दत्तराया ।।

जीवन थोरले
सामोरे आलेले
जाणून घेतले
स्वस्थपणे।।

वाहतो मी आता
नेशील तिकडे
सरळ वाकुडे
जैसे तैसे ||

कुणी दुखावले
कुणी सुखावले
कर्मात घडले
काही एक ||

प्रेमाला द्वेषाला
घेतसे झेलून
आलेले चालून
प्राक्तनाने||

विक्रांत भावना
भरून भिजला
करुनी दत्ताला
जिवलग ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने







गुरुवार, ३० मार्च, २०१७

जाणीव




जाणीव

तुझ्या आहेपणाची
देहात पडलेली सावली
घेवून मी जगतो आहे
खरतर मी अजूनही
केवळ मानतो आहे
मी हा तूच आहे
तलावात पडलेल्या
प्रतिबिंबा सारखा
समजा ..

मी नाही मानले ते
तरीही ते प्रतिबिंब
तुझेच असणार नाही का?
आणि जर खरोखच मी
ते प्रतिबिंब नसून
स्वत:ला खुश करण्या करता
केलेला खटाटोप असेल तर ?
आईने दाखवलेल्या
बागुल बुवा सारखा तर ..?

तरीही हे जगणे
तेच राहीन नाही का ?
आणि मी कुणीही नसलेला
तो एक देहधारी सजीव
त्या न दिसणाऱ्या
अमिबा सारखा ..!!

पण मग ही जाणीव
असण्याची..
अन जाणण्याची ..
तिचे मूळ काय आहे ?
जे खुपत असते मनाला
जगण्यातून उसंत मिळताच
व जगण्याची निरर्थकता
कळून येताच...

या अनाहत प्रश्नांचा
मागोवा घेत घेत
मी येतो परत परत
त्या तिथेच
जणू काही मग
मीच तो प्रश्न होतो

आणि वाटू लागते
बहुदा तो प्रश्नच
तुझे रूप असावे
माझ्या मधले !!


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने






बुधवार, २९ मार्च, २०१७

दत्ते लुबाडले





भर संध्याकाळी सूर्य उगवला
चंद्रमा दिसला अमावासी ||
रुतले गुलाब जहरी स्पर्शाने
जाहले जळणे चंदनाने ||
बोलणे मधुर रुतले उरात
सुगंध जळत गेला घ्राणी ||
काळवेळ भान व्यर्थ आकळले
विक्रांत जळले पुन्हा येणे  ||
दत्ते लुबाडून जगणे चोरले  
अर्थ हरवले घोकलेले ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने


मंगळवार, २८ मार्च, २०१७

बाई !!!




सतत होवून घरभर वारे वावरते बाई
थकले तनमन तरी सदैव हसत असते बाई

घर सोडूनी कर्तव्या जरी दूर कधी जाई    
घरा वाचून एकटी कधीच पण नसते बाई

येता प्रलोभने मनमोहक इंद्राची जरी
घर मोडण्यास चंद्रमौळी घाबरते बाई

कधी अवमानित दु:ख दाटली असे धुत्कारली
आत परी ज्वालामुखीच भरली असते बाई

या दुनियेच्या बाजारात कधी विवश जी उभी  
त्या दुनियेसाठीच परी ती आई असते बाई

खचती भिंती वादळात छप्पर उडून जाती
त्या मातीतून पुन:पुन्हा स्वर्ग सजवते बाई

देह स्वर का जरी वेगळा अबला किंचित ती
उर्जा तीच जगताची या विश्व घडवते बाई

आई बहिण मुलगी पत्नी अथवा मैत्रीण की
रे मूढांनो बाई ही केवळ नसते बाई

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in 


सोमवार, २७ मार्च, २०१७

झाकले ते प्रेत होते




झाकले ते प्रेत होते
**************


सुटलाच गंध शेवटी
झाकलेले प्रेत होते
उडणे कफन तर
केवळ निमित्त होते

का मारल्यास चकरा
तेथे कुणीच नव्हते
होणार शेवट काय
तुजला माहित होते

नेहमीच आडवाटे
फसवे भूत असते
करण्यास घात वार
संधीच पाहत होते

जग गोजिरे दुरून
आत जळत असते
देण्यास मिठी तू जाता
मूर्ख फसगत होते

रडशी वेड्या कशाला
झाले जे होणार होते
रे मान सुख तू मनी
दत्त बडवित होते

विक्रांत दु:ख तुझे हे
सांग का कधी नव्हते
पाचवीस पुजलेले
सदा नशिबात होते

हा प्याला अजुनी कारे
मागतो विश्वास खोटे
फुटे बाटली जरी नि    
जगणे संपत होते

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in 


रविवार, २६ मार्च, २०१७

श्रीराम आणि सीता




श्रीराम आणि सीता
*****************.


त्यांना वाटते राम कठोर आहे  
निर्दयी आहे  !
त्राटिका नावाच्या स्त्रीचा वध करणारा
वालीला आडून मारणारा
पत्नीला अग्नी परीक्षा करायला लावणारा
आणि गर्भवती असतांना
तिला रानावनात सोडणारा
ती पुन्हा भेटता
पुन्हा परीक्षा दे सांगणारा !

पण तिच्या साठी
रानावनात व्याकूळ होवून रडणारा
पशु पक्षांना विलाप करीत विचारणारा        
ऋषमुख पर्वताच्या कुठल्या कड्यावर
तिला स्मरत उद्गीन खिन्न बसणारा
वर्षा ऋतू एवढेच अश्रू ढाळणारा
तो राम कुणालाच कसा आठवत नाहीस

शेकडो मैल चालून
निष्काशित वानरराजाची मैत्री पत्करून
प्रचंड युध्द टाळून
सत्ता परिवर्तन करून
तो विराग्या सारखा गुहेत राहिलेला
हे सारे कुणासाठी

प्रचंड सेतू बांधून
अलोट सैन्य जमवून
लंके सारख्या अजिंक्य राष्ट्रावर
आक्रमण करणारा
तो प्रेमी त्यांना कसा स्मरत नाही ....

कोण म्हणते रावणाचा वध हे
रामाच्या जीवनाचे कर्तव्य होते
अरे ते तर सीतेच्या प्रेमाआड येणारे
एक क्षुल्लक चिलट होते
ती जानकीच रामाच्या जीवनाची केंद्र होती
सीता उणे रामकथा ती कथाही न उरती

श्रीराम जानकीजीवन तर होताच होता
पण तो तेवढाच लोकाभिराम होता
रामाला ठेवायचा होता एक आदर्श लोकांपुढे
एक जीवन शैली समाजापुढे
ही असेल पारदर्शक काचे प्रमाणे
आणि त्याच्या या आदर्शापुढे या ध्येयापुढे
त्याला करावे लागले
असंख्य त्याग अनंत बलिदान
सोसावे लागले दु;ख, वनवास, विरह

कारण राम हा आदर्श जनमानसाचे प्रतिक होता
त्या प्रतिमेचा त्याला शापही होता
म्हणूनच हजारो राज्य आले अन गेले  
पण रामराज्य हे रामराज्यच राहिले
लोकांच्या मनात आणि स्वप्नात

त्या मर्यादा पुरुषोत्तमाचे प्रेम
क्वचित कुणाला कळले असेल
त्याचे दु:ख क्वचित कुणी पहिले असेल
आम्ही आमच्या आजच्या फुटपट्टीने
मोजू पाहतो त्याची उंची
आणि स्त्रीमुक्तीच्या परिभाषेत
पकडू पाहतो त्याची कृती
जी वाटते आम्हाला
भयंकर अन्यायी अक्षमाशील
मग आम्ही करतो निषेध
त्याच्या निर्णयांचा ,धोरणांचा ,कृतीचा

माझे म्हणणे एवढेच आहे
रामाला राम म्हणून पाहावे
देवत्वाच्या कोनाड्यातून क्षणभर काढून
आपला मित्र सखा बंधू म्हणून
त्याच्या जीवना कडे पाहावे
त्याचे दु:ख समजून घ्यावे

आणि तरीही तुमची मते तीच राहिली
तर तुम्ही न पुसणाऱ्या अक्षरांचे
शिलालेख आहात
एवढेच मी म्हणेन

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in 




दत्त बडवतो

दत्त बडवतो ********* दत्त बडवतो मज बडवू दे  दत्त रडवतो मज रडवू दे  फटका बसता जागृती येता कुठे जायचे मज कळू दे  ॥१ प्रवाही वाहून ...