जे.कृष्णमुर्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जे.कृष्णमुर्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ४ जून, २०१८

सांज लय


सांज लय

सांजवेळी एकटाच
घराच्या मी छतावर
पश्चिमेचे गार वारे
घेत मंद अंगावर

न्याहाळत होतो सुर्य
तदाकार होत होत
विसरले देहभान
जाणीवेला आक्रसत

कृष्णमेघ इवलाले
भेदूनिया मज गेले
किरणांचे मृदू स्पर्श
अंतरात उतरले

हळू हळू मीच झालो
माझ्यातील आकाशाचा
अंतरात मग फूटे
झरा एक आनंदाचा

जाणिवेत उमलले
लक्ष ग्रह गोल तारे
विश्व होतो पाहात मी
कवळून सारे सारे

सांजवेळ झाली तेव्हा
वेळ सुवर्ण साजरी
कृष्णजींचे शब्द गुढ
रुणझुणले अंतरी

कालातीत असे काही
मज भेटुनिया गेले
नामातीत गुढगम्य
अंतरात उमटले

(कृष्णजी=जे.कृष्णमूर्ती )

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
Http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, २६ डिसेंबर, २०१५

जे.कृष्णमुर्ती माझा बाप ...






जे.कृष्णमुर्ती माझा बाप ...
नाते असून नसल्यागत
कठोर तर्कट अगदी स्पष्ट
करुणामय अन प्रेमळ आत  

शब्द त्याचा तलवारीगत
दयामाया नसल्यागत
जातो कापत उघडे करत
सांभाळलेले सारे स्वगत

हे सांभाळू का ते मनात
दैवी धन्य ते पुजू जनात
मिरवू दावू सांगू लोकात
परी न ठेवी काही हातात

दुसऱ्याचे ते हवे कशाला
कर कमाई जाण स्वतःला
अर्थावाचून शब्द साठला
दे फेकुनी रे दूर तयाला

सत्वरजतम एकच असते
पापपुण्य ही मुळीच नसते  
थर मनाचे मन सांभाळते
तेच एक ते जन्म खेळते

सुरक्षितता अन सातत्य
मानस यातच रमते सत्य
देवधर्म तव पूजाअर्चाही  
असती पळवाटा अनित्य

ऐकुनी हे मन घाबरते  
अन अंधारी आत पाहते  
आत पाहते काही जाणते
जाणले ते त्याचे असते


डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in/




सोमवार, १८ मार्च, २०१३

जे.कृष्णमूर्तीच्या पुस्तकात

जे.कृष्णमूर्तीच्या पुस्तकात
एकदा मला पाडगावकरांची
कविता सापडली .
तेव्हा पासून मी
पाडगावकरांची कविताच
वाचू लागलो .
वाचता वाचता एक दिवस
तिथे मला पुन्हा
जे.कृष्णमुर्ती भेटले
आणि म्हणाले
“ कळले का मी म्हटले होते ते, 
लिहलेली कविताच
फक्त कविता नसते!

मग मी पाडगावकरही  
ठेवून दिले.
कारण,मला आता 
शब्दात नसलेली कविता
कळू लागली होती .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

गुरुवार, २० डिसेंबर, २०१२

अभिलाषा




अभिलाषा हि
भविष्यातील आसक्ती असते
आणि प्रत्येक आसक्तीत
अंतर्भूत असतात
भीती मत्सर द्वेष चिंता
अन सर्व व्यापी पराधीनता
या पराधीनतेतून
जावे वाटते मुक्त होऊन म्हणून
सुखभोगाचा मानसन्मानाचा यशाचा
पाठलाग करते मन
अन जाते स्वत: पासून दूरवर पळून
पण जेव्हा जाते भूल उतरून
आणि वेदना घेते वेटाळून
तसेच मन पुन्हा
तडफडते होते उदासीन
या पाळण्यातील निरर्थकता जाणून
कुणीतरी या आसक्तीतून
मुक्ती देईल  म्हणून
धावते मठ मठातून
मग त्याला मिळते मुक्तीचे आश्वासन
सोबत त्याच्या असतात पण
अटी,पाळायचे नियम, कडक व्रताचरण
याचे यथावकाश  फळ
"निरासक्ती " नक्की मिळेन
सांगीतले  जाते आवर्जून
पण या फळाची आसक्ती
कशी देऊ शकेल निरासक्ती......?
अभिलाषेपासून  मुक्ती.......?

 विक्रांत प्रभाकर

एकाकीपणा





हेतू कल्पना फलापेक्षा आणि अभिलाषा
या सा-या आहेत आसक्तीच्या सावल्या
आसक्तीच्या मुळाशी असतो एकाकीपणा

या एकाकीपणातून सुटका करून घेणे
हेच आसक्तीचे मूळ कारण असते

हा एकाकीपणा का निर्माण झाला
याला अर्थात अनेक उत्तर आहेत
आनुवांशिकता उपजत गुण वगैरे

पण या उत्तरांनी काय साध्य होणार
एकाकीपणा तर तसाच राहणार

म्हणून अत्यंत उत्कटतेने
सावधपणे डोळ्यात तेल घालून
हे एकाकीपण जेव्हा मी स्वतः पाहीन

त्या पासून न पळता त्याला न घाबरता
त्याला न नाकारीता तर तो एकाकीपणा
आपले स्वरूप उघडे करून जरूर दाखवीन

असे पाहत असतांना कुठल्याही विचाराविना
कुठल्याही सिधान्ताविना आराखाडयाविना
सर्व शक्ती लाऊन पणा उत्तर मिळणे क्रमप्राप्त आहे
प्रत्यक्ष......

विक्रांत प्रभाकर

प्रज्ञेचा प्रारंभ





अहंचे अविष्काररुपी मन
जेव्हा बसते बळकावून
जीवनाची सारी सूत्रे
तेव्हा जातो नष्ट होऊन
सत्याचा प्रकाश अन
त्यातून होणारा परमानंद
म्हणून हे निजज्ञान होणे
अहम चे ज्ञान करून घेणे
हाच प्रज्ञेचा प्रारंभ आहे

विक्रांत

पालखी

पालखी  *** दत्त कुणा भेटतो का  भेटतो वा साईनाथ  वाहूनिया पालखीला  चालूनिया घाट वाट दत्त कुणा कळतो का  करूनिया थाटमाट सुटते का अं...