गुरुवार, १८ सप्टेंबर, २०१४

आजोबाचे मरण..







त्या एका वर्षी खूप पाऊस पडला
दुष्काळ संपला अन माझा आजोबा  
आषाढातील एका ओल्या संध्याकाळी
अवसेच्या आधी जग सोडून गेला
चार वर्ष पावसाविना सरली होती
केलेली सारी मेहनत वाया गेली होती
तरीही मनावर दगड ठेवत अन
हातावर आपल पोट सांभाळत
त्यांनी जगून काढली होती.  
खूपच काटक म्हातारा
पंच्याहत्तरी पार केलेला
उन्हात रापलेला शेतात खपलेला
काहीसा खंगलेला काहीसा वाकलेला
तरीही जिवट आणि चिवट
बाभळीसारखा टिकून राहिलेला .
मरायच्या आधी त्याला पहायची होती
हिरवीगार शेती भरलेली नदी
शेताच्या बाजूचा उधानला ओढा .
त्या वर्षी खूप पाऊस पडला
अन तो आजारी पडला
झरणाऱ्या प्रत्येक नक्षत्रा बरोबर
त्याचा जीव उतावीळ होत होता
शेतात जायला शेत पाहायला
पण म्हातारी आजी त्याला
जबरदस्तीने अडवून ठेवत होती
ताकद येऊ द्या,बरे वाटू द्या,
मग जा ..असे म्हणत होती
आता तो मनानेच
पिकाची उंची मोजत होता
विहारीचे पाणी जोखत होता
आजी कडून पुन:पुन्हा
खात्री करून घेत होता
त्याच्या डोळ्यात ख़ुशी होती
चेहऱ्यावर तृप्ती होती
दरवर्षी पोळ्या आधी उत्साहाने
भरलेला हौशी आजोबा
त्या आदल्या दिवशी
अंथरुणावरून हलूही शकत नव्हता
त्या संध्याकाळी बाबांच्या हातून
त्याचा आवडता चहा तो प्यायला
अन बाबा शेताच्या वाटेला लागे पर्यंत
देह सोडून शेतावर पोहचला देखील
दुष्काळानंतर बहरलेले शेत बघायला ..


विक्रांत प्रभाकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भक्ताचिया गोष्टी

भक्ताचिया गोष्टी ************** भक्ताचिया गोष्टी डोळा आणी पूर  भावनांनी उर भरू येई ॥१  आहाहा किती रे भाग्याचे पाईक  पातले जे सुख...