शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

बासरी

बासरी
******
माझिया देहाची 
होऊन बासरी 
वसू दे रे मज 
तुझिया अधरी ॥

तुझिया श्वासाच्या 
मधुर फुंकरी 
रितेपणा भरो 
स्वर्गीय लहरी ॥

आणिक काहीच 
मजला नको रे  
तुझिया रुपास
जीव हा जडो रे

तसा तर वेत 
हा आहे इवला 
पोकळ केवळ 
छिद्रांनी भरला 

फुंकता प्राण तू
होईल जागता 
माझे मी पण हे
मज ये जाणता 

तुझीच कृपा ती
केवळ कान्हाई 
आणेल मजला 
तुझ्याकडे  माई 

एकाच श्वासाचा 
दे एकच स्वर 
एकाच स्पर्शाचा 
दे स्वर्गीय वर 

होईल सार्थक 
मग या जन्माचे 
अनाथ अनाम 
पोकळ वेळूचे 
*******

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https:// Kavitesathikavita.blogspot.com

शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२०

कोजागिरीला!!


कोजागिरीला
***********

उलटून रात्र गेली 
माझे नेत्र आहे जागे 
अजून जागणे का रे 
माझे होत नाही जागे 

झरतो नभात चंद्र 
बघ थेंब अमृताचे 
झेलतो मी देहावरी 
का होत नाही रे माझे

हि आकाश  व्यापलेली 
उज्वल शुभ्र वेदना 
तिमिरास दे उठाव 
ती तुझीच रे कामना 

मी मागतो न तुजला 
उत्सव या गात्रातला 
हा देह मिटून जावा 
होत चांदण्याचा शेला

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०२०

माझे शब्द

शब्द 
********

माझिया शब्दांशी
करून लगट 
धरेल संगत 
काय कुणी ॥

शब्द नव्हे प्राण 
झाले अवतीर्ण 
सार ते घेऊन 
जीवनाचे ॥

लिहिले कशाला 
नकळे कुणाला 
मग आकाशाला 
दान दिले॥

ठेवी बा जपून 
तुझ्यात कोरून 
येई परतून
देई तेव्हा ॥

किंवा कुठे कुणी 
भेटता लायक 
शब्दांचा नायक 
मिठी दे रे ॥

विक्रांत शब्दांचा 
धनको रत्नांचा 
आतुर हातांचा 
वाटण्याला॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
कविते पलिकडल्या कविता 
**********

शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०

माझी माक्याची आई

माझी माक्याची आई 
****************
माया पिकल्या स्पर्शाचे 
गीत काळजात वाजे 
सुरकुतल्या हाताचे 
प्रेम गालावर नाचे 

किती दिस न माहित 
मेघ धो धो कोसळून 
काढी एक एक थेंब 
पिळुनिया गात्रातून 

किती कौतुक डोळ्यात 
होत्या झेपावत लाटा
घेईल कवळून हाती 
हाव मुळी न थांबता

शब्द मिस्कील मधुर 
म्हणे सुनेल नावास
प्रेमे सांगे दटावून 
नको तरासू विजूस

कधी जातांना गावाला 
दिली चवली हातात 
मुद्रा सुवर्णाची तीच 
माझ्या अजून मनात 

पुडे गोल फुटाण्याचे 
सवे शुभ्र चुरमुरे 
सुख लुटायाला सवे 
येत चिमण्या पाखरे 

तीच स्मरते बसली 
चुलीसमोर धुरात 
पीठ काथवटी असे 
एकतानता तयात 

तिचे चालणे लयीत
झपझप राणीगत
तीक्ष्ण नजर बारीक 
हासु रंगले ओठात 

केस पिकले पांढरे 
भांग सरळ रेषेत 
जग पाहिले जिंकले 
जरी जीवन कष्टात

माझी माक्याची ती आई 
स्पर्श मायेचे देऊळ 
गंध रंगल्या पानांचा 
घाली मनात हिंदोळ 
*******
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

भय

भय हे कसले 
मनी दाटले
व्यापून उरले 
जीवनाला ॥
भय अंधाराचे 
भय विलया चे 
भय नसण्याचे 
मी उद्याला ॥
अशा भयाचा 
जन्म कुठे तो 
कसा मी होतो 
हे न कळे ॥
का भय आले 
मनी उपजले 
काळा मधले 
सांडपाणी ॥
घडल्या वाचून 
घडणे होऊन 
मनास छळून 
घेते उगा ॥
भय मी पाहतो 
भयात शिरून 
घेतो जाणून 
भय कसे ॥
अहो भय मीच 
काळ होऊन 
जातो हरवून 
दिसे मला ॥
भय पाहता 
भय हरवले 
बागुल बसले 
अंधारात ॥
हसतो विक्रांत 
भय विरहित 
जणू आकाशात 
चंद्र नवा .॥

**********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०

दत्त व्हायला

दत्त व्हायला
*********
दत्त व्हायला 
दत्त भजतो.
काठावरती 
भणंग जातो ॥

जटाभार तो
माथी वाहतो
गाठी अवघ्या 
सोडून देतो 

दत्ते वाळला 
तरीही गातो 
देही धुनीची 
आग जाळतो 

अंतरातील
नागा  विक्षिप्त 
राख कुसुमी
शिंपीत जातो 

बम बम बम 
घोष मुळीचा 
ध्वज गाडतो
मी नसल्याचा

म्हणो विक्रांत 
जग वेडपट 
लाथा झेलतो
परी सुखात
**********
कवितेसाठीकविता
**********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

मैत्री

मैत्री 
*****

बऱ्याच वेळा मैत्रीच्या 
या विलक्षण रसायनाकडे पाहतांना 
मैत्री मधील ही गुंतागुंत किंवा 
सहजपणे येणारी एकतानता पाहतांना 
वाटते मैत्री आहे तरी काय?

कधी वाटते 
मैत्री असते गरज 
माणसाच्या मनाची 
भयानक एकाकीपणात 
उतारा म्हणून मिळालेली 
पुडी ही दव्याची

अन एकदा का संपले 
हे एकाकीपण 
सरते गरज या दव्याची 
अन सवे संपून जाते मैत्रीपण

गरज असते देहाला 
कधी मनाला 
संकटात धावायला 
कोणीतरी मदत करायला
आत्ता नसेल पण उद्या पडणार 
त्याला नाहीतर 
तर मला घडणार
म्हणून सावध एक गुंतवणूक 
करतो प्रत्येकजण 
आपल्या आजूबाजूला पाहून 
परतीच्या व्याजाकडे 
आशेने लक्ष ठेवून

आणि तो  विरंगुळा 
आपण आपल्याला 
होत नाही कधी 
म्हणून हा कोंडाळा 
जमा करून सभोवताली
आपण ऐकवतो गाणी 
कविता गझल लावणी 
देतो बार उडवूनी

असु दे रे 
त्यात वाईट काय नाही 
पण मग उगाचच 
आपण आपलीच टिमकी वाजवत
आपण आपल्यालाच मिरवत 
बसायचं हे काही खरे नाही.
यात मैत्री दिसता दिसत नाही

मैत्रीचे नाणं बहुदा चालतच 
कधी कधी खोट असूनही 
भाव खातच .

तर मग काय  मैत्री 
कुर्बानी यारी 
दुनियादारी 
व्यर्थ आहेत का सारी ?
मी कुठे नाही म्हणतो 
मीही फक्त एवढेच म्हणतो 
ती एक गरज आहे 
वाटेवरून चालताना 
सुरक्षतेच एक कवच आहे 

आपण अडकतो 
कधी मित्रात 
त्याच्या भावनात 
आपण जीवनाचा 
भाग होतो त्याच्या 
कधी त्याला करतो 
आपल्या जीवनाचा भाग 
कारण 
तेच जुनं  पुराणं
आणि खरंखुरं

माणूस हा प्राणी आहे 
कळपात राहणारा 
कळप कुठेही असू दे 
प्राणी तो प्राणीच असतो
सहवासात सुरक्षतेचे छत्र शोधतो

बाकी मैत्री तर 
कुणी गौतम बुद्ध करू जाणे 
कोणी कृष्णच निभावू जाणे

मैत्री
काहीही नको असलेली 
फक्त उमलून आलेली 
फुलासारखी 
येणाऱ्या प्रत्येकाला गंध देणारी 
तोडणाऱ्याला 
कुरवाळणार्‍याला 
वा पायी उडवणाऱ्यालाही !

अशी मैत्री खरंच असते का 
या जगात कुठे कधी ?
का हे सारे स्वप्नरंजन आहे 
मानवी मनाचे ?
कुणास ठाऊक 

कदाचित 
जीवनाचे फुल 
संपूर्णतेने फुलन आल्यावर 
उलगडणारा रंग 
प्रकटणारा सुगंध 
अपार स्नेहाचे मधु अंतरंग

त्याचे नाव मैत्री असेलही !!

कवितेसाठीकविता
**********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...