शनिवार, २९ सप्टेंबर, २०१८

दत्त कृपेची चादर


********
माझ्या भग्न मनावर 
दत्त कृपेची चादर 
आल्या भरून जखमा 
फुल नवे वेलीवर 

झाले आभाळ हे मन 
धरा इवली जीवन 
एक बिंदूला अफाट 
नाव घेई रत्नाकर 

कुणी बांधल्या घाटाला 
कृष्णा धावते निवांत 
डोळा पाहण्या रुपास
होते एकेक लहर 

तुवा दिधले तयास
जपे काळजाच्या आत 
मन सुख चांदण्यात 
चंद्र मण्याचा पाझर 

नको विचारूस मना 
आला विक्रांत कुठून 
नाव गावाचा आकार 
गिळे शून्याचे विवर 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१८

बाप्पा निघता



बाप्पा निघता
********

बाप्पा निघता गावाला 

डोळे पाण्याने भरले 
दहा दिसांचा सोहळा 
दहा निमिष गमले ॥

का रे येतोस तू असा 

वेड लावतो जनाला 
जातो जलात विरून 
घोर लागतो जीवाला ॥

पत्री फुलांच्या गंधात 

दीप कापूर प्रकाशी 
माझे धुंदावते मन 
चित्त जडते रूपाशी ॥   

रोज वाद्यांची वर्दळ 

खणखणती आरती 
नाद समाधीत मग्न 
माझी इवलीशी भक्ती ॥

आता आताच होतास 

गेला मिळून जलात 
रिता पाहूनिया पाट
दुःख दाटते मनात ॥

जरी असशी मंदिरी 

भेट तिथेही घडते 
जाशी येऊनिया घरी 
नाते अनोखे जडते ॥

भाव बंधांतून तया

सख्य अरुपाशी होते 
दिव्य दुःखाच्या स्पर्शाने 
ज्योत आतली पेटते ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 

http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, २४ सप्टेंबर, २०१८

धागे तुटले तटाट


धागे तुटले तटाट

काल जुळल्या नात्याचे
पिळ काळजात होते
धागे तुटले तटाट
मौन पापण्यात होते

काही घडला निरोप
कुणी समोर नव्हते
काही सुटले जपले
जरी आपुले नव्हते

घडो विरह जन्माचा
सारी जळूनियां ज्योत
गीत काळोखाचे मौन
जप खोलवर आत

जन्म जगण्याची व्यथा
कोण घेऊनिया येते
कळ लागता जराशी
सारे आकाश फुटते

सरे मनातील भय
परी उदास  कोपरे
साऱ्या चिणल्यात फटीं
नाही झोंबणार वारे

नाव गाव न कुणाचे
कधी ओठात येणार
सय वाफ ती थेंबाची
कुणा नाही कळणार

काही घडेल कथा ही
नव्या जन्माच्या पानात
गाठ बसली अंतरी
असो सोबत जन्मात


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


रविवार, २३ सप्टेंबर, २०१८

दरवर्षी विसर्जनी



दरवर्षी ॥विसर्जनी

फटाके फुटती 
नगारे वाजती 
पैसे ते जळती 
जनतेचे ॥
कोणी काय केले 
कुठून ते आले 
प्रश्न हे असले 
पडू नये ॥
आहाहा सेट तो 
असेल लाखांचा 
हिशोब तयाचा 
कोण सांगे ॥
डीजेचा आवाज 
ठणाणा वाजतो 
डोके उठावतो 
सारी रात्र ॥
कशासाठी चाले 
व्यर्थ हा गोंधळ 
ज्ञानी गावंढळ 
मौन का रे ॥
न कळे बाजार 
कधी हा थांबेल 
भक्तीचा कळेल
अर्थ जना ॥
देवा श्री गणेशा 
मागणी तुजला 
आवर चालला 
प्रकार हा ॥
कानात किटला 
विक्रांत थकला 
कापूस कोंबला 
कानी मग ॥


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, २२ सप्टेंबर, २०१८

सांज आणि भय



सांज आणि भय
***********

मृदू पायाखाली वाळू
वर पाखरांचा थवा
देहा वेटाळून होती
धुंद सागराची हवा

लाटा येऊनिया होत्या
पुन्हा पायास स्पर्शत
पायाखालील वाळूस
जणू मजेने ओढत

सान सोनूले ते जीव
देहा शंखात ओढून
पाणलोटा सवे होते
गडगडत लोळत

कुठे भरले डबके
शांत ध्यानस्थ बसले
निळे आकाश थोरले
तया आकारी भिनले

धाव धावूनिया लाटा
मागे सरल्या रुसल्या
लाल रेषा क्षितिजाच्या
हळू जळी मिसळल्या

लखलखणारे पाणी
रक्त सुवर्ण किनारा
आत मिटलेले मन
थोडा जागृत कोपरा

सांज वेळ ती कातर
मग देहात भिनली
कानी गंभीर गर्जना
फक्त गाज ती उरली
**
कुणी आले तर आता
इथे यांच पाण्यातून
एक विचार उगाच
गेला मनाला शिवून

त्याच क्षणास वाटला
लाटा आकार वेगळा
भास म्हणून असाच
वेडा विचार हसला

तिच इवलाली भीती
झाली क्षणात सागर
वाटे घेरलेले जणू
काही नसून समोर

मागे वळलो लगेच
दिवा दूरचा पाहत
झोत वाऱ्यांचे जणू की
होते मागुती ओढत

पाय खोलवर होते
मग उगाच रुतत
वाट हरवून  गेली
प्राण आलेले कंठात

वाळू सरता सरता
जीव सुखावला थोडा
अरे सुटला सुटला
स्वर कानी  ये उडता

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, २० सप्टेंबर, २०१८

कवयित्री विनिता पाटील यांना श्रद्धांजली




कवयित्री विनिता पाटील यांना श्रद्धांजली
**********************

जीवन क्रूर असते
का मृत्यू ?
कळत नाही
रोज समोर दिसणारे
असंख्य मृत्यू  पाहूनही
प्रश्न सुटत नाही !

निर्व्याज मुलांसारखे
मृत्यू ओढून निजलेले
चेहरे पाहिले की
अस्तित्व थरारते
हवालदिल होते .

जीवनाने सळसळणारे झाड
पडताच उन्मळून
अहंकार जातो चूर चूर  होवुन .
अन परवशता घेते वेढून.

विनिता ...!

काव्य रसाने बहरून  आलेला
तुझा जीवन  वृक्ष
त्यावर सळसळणारे
प्रत्येक कवितेचे पान
शब्दाशब्दातून परावर्तीत होणारे
प्रतिभेचे किरण
अन त्याचा तो संपलेला प्रवास पाहून
सुन्न होऊन गेले मन

तू  होतीस
कवितेच्या समृद्धीवर
लौकिकाच्या लहरीवर
विराजमान झालेले
दिमाखदार काव्य सुमन ..
शब्दांच्या साम्राज्यात
आपले वतन प्रस्थापित केलेली सम्राज्ञी
वृत्त लय होते तुझ्यासमोर
अष्टोप्रहर मान झुकवून
पण
तू गेलीस अचानक
यत्किंचित व्हायरस चे आक्रमण
थोपवल्यावाचून

कधी कधी असे वाटते
जीवनातील दुःखांचे आक्रंदन
करते आमंत्रण
शब्दावाचून " त्याला "
आपला महा सखा म्हणवून
असेच काही तर
नसेल घडले तुझ्या बाबतीत
तुझ्या कवितेतील व्यथा
अन् तडफड पाहून

खरतर तू ज्या मनोभूमीवर होतीस
तिथे तुला खूप काही मिळायला हवे होते
पण अपेक्षा अन आस्वादकता
रसिक मनाला मिळालेले
वरदान आहे की शाप
हेच नाही उमजत

हे माझ्या काव्यजगतातील
मैत्रिणी
तुझ्या अश्या अचानक
चटका लावून जाण्याने
तुझ्या कवितेचे गडद ठसे
उमटले आहे माझ्या मनावर
हवे नको या पर्याया वाचून
म्हणून तू गेलीस तरीही
राहशील  माझ्या सोबत
तुझ्या शब्दातून डोकावत
तुझी विलक्षण कहाणी सांगत
दुःखाची सार्वकालीन चादर पांघरत
तुझ्या वेदनांवर

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

कवितेचे ऋतू

कवितेचे ऋतू
*********
मनाच्या मातीत
निजलेल्या कविता
वाट पाहतात
कुणाच्या स्पर्शाची
हलकेच जागवण्याची
कोवळ अंकुरांची

काही कवितांना
मिळतो तो ऋतू
उमलून देणारा
स्वप्न जागवणारा
आकाशात नेणारा

पण ज्या कविता
कधी अंकुरत नाही
अंतर उघडत नाही
त्या कवितांचे संपणे
अपरिहार्य असते
निसर्ग नियमानुसार

पण त्या त्यांच्या
विखुरल्या कणातून
हरवल्या पणातून
मनाची माती जाते
अधिक सुपीक होऊन

कारण जगणे म्हणजे
त्या मातीचे गाणे असते
कविता सृजल्या तरीही
अथवा करपल्या तरीही


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


सूत्र

सूत्र ***** देऊन सूत्र जीवनाची सारी तुझ्या हातात  आता मी रे निवांत आहे वाहत श्वासात जगणे चालू आहे नि धावणेही चालू आहे यशापयश दोघ...