युद्ध अटळ आहेत
*****
युद्ध अटळ आहेत विध्वंस ही अटळ आहे
सृजन पालन मरण हे चक्र
सदैव चालणार आहे
शहर नष्ट होतात
संस्कृती लयास जातात
काळरुपी महाप्रलयात
राष्ट्र बेचिराख होतात
निसर्गाच्या दृष्टीने माणसांची शहर
आणि मुंग्यांची वारूळ
दोन्ही सारखीच असतात
मुंग्या ही लढतात एकमेकांशी
आणि काबीज करतात वारूळ
मुंग्याही बळी जातात, कैदी होतात
गुलाम केल्या जातात किंवा
मारून टाकल्या जातात वापरून
दुसऱ्या वारुळातील प्रजातींकडून
हे वैर हा द्वेष ही असूया माणसाची
ही जगत्जेता होण्याची
आकांक्षा माणसाची
हीच तर शस्त्रे आहेत
काळात्म्याची विनाशाची
अन्यथा समतोल कसा साधणार
या अफाट जनसंख्या वाढीचा
या नाश पावणाऱ्या जंगलाचा
या असंख्य जीवांना
नष्ट करणाऱ्या प्रदूषणाचा
या स्वार्थलोलूप हव्यासाचा
कदाचित माणसांना मारणारे
हे माणूस यंत्र
निसर्गानेच नियोजित केले असावे
हि यादवी माणसा माणसातील,
धर्माची राष्ट्राची भाषेची
शस्त्रे घेऊन उभी आहे
विनाश तर होणारच
हे अलिखित प्रारब्ध असते
कारण मरणातूनच पुन्हा
सृजन होत असते
हे चक्र सदैव असेच चालू राहते
पण का आणि कुणासाठी
हे प्रश्न ज्याला पडतात
त्यालाच ते सोडवावे लागतात
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा