बुधवार, ३० ऑगस्ट, २०२३

दोन सल्ले

दोन सल्ले
********
दोन तरजोडी तर कधीच करू नका
एक लग्न करताना दोन नोकरी धरताना 
तर एक  असा सल्ला मिळाला 
फुकट आम्हाला पण किती उशिरा 
अन जरी अगोदर मिळाला असता  
तरी काय पाळता आला असता ?

मिळेल ती नोकरी धरावी लागते पोट भरायला 
हजारो बेकारांच्या दुनियेत बऱ्यापैकी जगायला 
सरकारी नोकरीच एक बर असतं 
कारण कायद्याचं युनियनचं पाठबळ असतं 
काम केलं नाही झालं तरी फारसं बिघडत नसतं 
हजेरी लागली की पगाराचं चाक फिरत असतं 
प्रायव्हेट मध्ये जरा खपाव लागतं 
आणि सांभाळून राहावं लागतं 
साहेबापुढं शेपूट हलवावं लागतं
वाहवाची फुलं उधळत राहावं लागतं
*
आणि लग्नाचं म्हणाल तर 
जी आपल्याला आवडते 
तिला आपण आवडत नाही 
तर मग काय करायचं 
घरोघर किती पोहे खात फिरायचं 
शेवटी ऍडजस्टमेंट तर करावंच लागतं .
आणि समजा एखादी आवडून लग्न केलं
 तरी पुढचं काय कुणाला कळतं
शेवटी सगळ्यात संसाराचा एकच सूत्र असतं 
त्यातून कसं तरी पार व्हायचं असतं 
आणि चक्र तर सगळीकडे सारखच असतं 
घरदार मुलंबाळं वाढवणं खेळवणं 
रुसवारुसवी फुगाफुगी तणातणी 
ओढाताण शिक्षण आजारपण 
अन मग शेवटी म्हातारपण 
तर मग हे सल्ले सल्ल्यासाठी ठीक आहेत 
पण अशी कितीतरी सुभाषित सल्ले
आम्ही फक्त फळ्यावरच वाचतो
आणि फळ्यावरच ठेवून देतो

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

मंगळवार, २९ ऑगस्ट, २०२३

माकड


माकड
******
एक माकड फिरते गरगर 
वरती खाली या इमारतीवर 
भला दांडगा तो हुप्या गब्बर 
घुसतो घरात चुकवून नजर 
डल्ला मारतो कधी फळावर 
नेतो चोरून खाऊ बरोबर 
लाल पिंकट मुख रे त्याचे 
भाव तयावर सदा भुकेचे 
जवळ जाताच भय दाखवतो 
भुवया ताणून दात विचकतो 
म्हणती बाबा आला हनुमान 
गेला त्याचा तो नैवेद्य घेऊन 
म्हणते बायको अति वैतागून 
तो गेला वेडपट रोपे उपटून
भय कुतूहल डोळ्यात उमटले 
टकमक टकमक पाहतात मुले 
अरे गेले कुठे पण ते वन खाते 
झाडाखाली कुण्या निजले वाटते
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

सोमवार, २८ ऑगस्ट, २०२३

उगाच


उगाच
*****

अशी खोल डोळ्यात पाहू नको उगाच 
बुडेल मी तुझ्यात जगेल मी उगाच ॥ १

अशी येत मनात गाऊ नको उगाच 
भिजून मी सुरात धडाडेल उगाच ॥ २

कशाला ग देतेस निमंत्रण उगाच 
बोभाटून होईल गाव गोळा उगाच ॥ ३

नको नको पैंजणे तू वाजवू उगाच 
होती फितूर पाय तोल जाईल उगाच ॥ ४

कळली न मजला  दुनियादारी कधीच 
कशाला मग खेळू डाव हरला उगाच ॥ ५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

रविवार, २७ ऑगस्ट, २०२३

माऊली

माऊलीस
********
थकलेल्या बाळाला 
घेई कडेवर आई 
चालवत नाही आता 
थोडे तुझे बळ देई ॥१
किती तुडवली वाट 
काटे मोडले पायात 
सारे सोसले पाहिले 
तुझा धरूनिया हात ॥२
नाही आडवाटे गेली 
माझी इवली पाऊले 
तुझे शब्द माझ्या जीवी 
गीत जगण्याचे झाले ॥३
झाली  ओढाताण कुठे 
बोल साहिले विखारी 
नाही जाऊ दिला तोल 
तुज जपले जिव्हारी ॥४
आता बहुत हे झाले 
त्राण माझे ग सरले 
येई धावून तू माये 
करी करुणा कृपाळे ॥५
तुझ्या शब्द पाळण्यात 
मज जोजव निजव
स्वप्न रेखिले ओवीत 
माझ्या डोळ्यांना दाखव ॥६
मग निजेल मी शांत 
तुझ्या प्रेमळ मिठीत 
सारे विसरून दुःख 
जन्म जीवन जगत ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

सर्प यज्ञ

सर्प यज्ञ 
******
जीवनाचे अत्यंत रसरशीत चैतन्यदायी 
तरीही भयावह रूप असते नागराजाचे 
त्याचा तो एकच फुत्कार
उमटतो शहारे अंगावर 
त्याच्या दंशभयाने या देहात  
वाहतात भयाचे कितीतरी लोट   
तरीही तो जेव्हा फडा उभारतो 
आणि डोलू लागतो कुठे थोडा दूरवर 
मंत्रमुग्ध होते नजर 
विस्तारतात बाहुल्या अन् 
विसरतो आपण आपले भान 

तो कधी काळा कधी पिवळा 
कधी ठिपक्यांचा तर कधी आकड्याचा 
कधी स्वतःच्याच जातीचा भक्षक 
किंग कोब्रा असतो
त्याचे प्रत्येक रूप 
असते भीषण सुंदर 
*
तो दिसत असतो जंगलात
 माळरानात शेतात निर्जन परिसरात 
एकांतप्रित तापट संन्याश्यागत 

त्याचे ते विषदंत असतात 
साधन शिकारीचे संरक्षणाचे 
पण  डसतात  कधीकधी 
मनुष्याला कळत नकळत 
अन् या त्याच्या  प्रतिक्षिप्त कृतीने 
घाबरून चिडून 
माणूस करू लागतो
संहार सा-याच सर्पजातीचा 
तो सर्प यज्ञ 
जो कधीच संपला नाहीत
अन् घडतच आहे विनाश
अश्या हजारो देखण्या जीवांचा 

माणसाला कळत नाही 
की तक्षकाय स्वाहा :
सोबत इंद्राय स्वाहा : नाही तर 
मनुष्याय स्वाहा : हेच घडू शकते .
कारण साखळीतील एक कडी तुटणे 
म्हणजेच साखळी तुटणे असते.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 



 

शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३

बुद्ध होत नाही तोवर

बुद्ध होत नाही तोवर 
***************"
निबीड भयानक अंधकारात 
संकटात दुःखात होता वाताहात 
आशेचा एक किरण शोधत असतो जीव 
दुःख संकट निराशा अपयश 
कुणालाच नको असते 
पण यशाचाच प्रतिध्वनी अपयश असते 
आणि सुखाचेच प्रतिबिंब दुःख असते 
सदा सगळ्यांनाच सदैव दुःख मिळत नसते 
किंवा सुखही मिळत नसते 

पण असतात काही अभागी जीव 
ज्यांच्या जीवनातील दुःखाची वाट 
दैन्याचा उतार सरता सरत नाही  

दुःखाचा जन्म मुळातच दारिद्र्यात आहे 
दारिद्र्याचा जन्म अज्ञानात आहे 
स्वतःचे अज्ञान स्वतःच्या क्षमतेबद्दल अज्ञान 
जगाचे अज्ञान जीवाबद्दलचे अज्ञान 
मनुष्यत्वा बद्दलचे अज्ञान
.
भौतिक सुखाच्या मर्यादा जाणून 
त्या मिळवणे ही एक पायरी आहे 
मनुष्य जीवनाची 
पण बहुतेक जीवनातील निरर्थकता 
एकूणच जीवनाची क्षणिकता तोच तोचपणा 
हे दुःखाचे कारण असू शकते का ?
म्हटले तर असते म्हटले तर नसते 
त्याच्याकडे कोण कसे पाहते 
त्यावर हे अवलंबून असते 

पण खरे दुःख आहे ते गमावण्याचे 
धन ज्ञान परिवार पद प्रतिष्ठा हरवण्याचे 
आयुष्यभर केलेली कष्टाची मिळकत 
उभारलेला डोलारा तो पडण्याची शक्यता 
हे जाणण्यात आहे 
हे सारे नेते मरण एका क्षणात 
अस्तित्वाच्या खुणा ही मिटवत 
हे नसणं मानसिक दुःखाचे कारण आहे 

अर्थात ज्याच्याकडे जास्त 
त्याची आसक्ती जास्त त्याचे दुःखही जास्त 
म्हणूनच संत महात्मे गातात 
निरासक्तीचे त्यागाचे गोडवे 
पण तेही मनाचे ट्रेनिंगच असते 
विवेकाने आणलेले वैराग्य असते 
.
दुःखाच्या निराकरणाचे मार्ग 
प्रत्येक जण शोधत असतो 
आपल्या कृतीप्रमाणे आपल्या समजेनुसार
पण हे अटळ सत्य आहे की 
दुःख कुणालाच सोडत नाही 
तुम्हाला दुःखासवे  जगावेच लागते 
कधी त्याला स्वीकारत 
कधी त्याचाशी तडजोड करत 
कधी हुशारीने शिताफीने 
जमेल तेवढे त्याला दूर ठेवत

पण ते येतच राहते 
अचानक संकटाच्या रूपाने 
आणि आपले व्याज घेतच राहते 
प्रत्येक जीवाकडून 
जोवर तुम्ही बुद्ध होत नाही तोवर

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

गुरुवार, २४ ऑगस्ट, २०२३

येई आता


येई आता
*******
दिलेस जगणे हे मज दत्ता 
काय ते हाता होते माझ्या ॥१
कुठे कसा अन् काय मी होतो 
जरी न जाणतो दयाघना ॥२
तूच उचलले गगनी ठेवले 
लाड पुरविले जगती या ॥३
परि ती खेळणी मजला देऊन 
ठेवीसी रिझवून दूरवरी ॥ ४
खेळ उमजला हा आता मजला 
बहुत चालला जगती या ॥ ५
थांबव सारे अन तू येरे 
उचलुनि ने रे मज आता ॥ ६
जगतो विक्रांत तुज आठवत
येई अवधूत दत्तात्रेया ॥ ७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...