शुक्रवार, ३० जून, २०२३

डॉक्टर शरद अरुळेकर

डॉक्टर शरद अरुळेकर
****************
काही लोक 
कित्येक वर्ष सोबत राहतात 
पण तरीही दूर दूरच राहतात 
तर काही लोक 
अगदी थोडाच काळ सोबत राहतात 
पण जिवलग होतात 
त्यातीलच एक माझा मित्र 
 डॉ.शरद अरुळेकर

दुसऱ्याची मन जपायची 
जिंकायची ही त्याची हातोटी  म्हणजे
काही जोपासलेली कला नव्हती
हा त्याच्या स्वभावाचा एक भाग होता
पानाचे कोवळेपण 
फुलाचे हळवेपण 
कळ्याची मृदुलता 
पाण्याची शीतलता 
जशी नैसर्गिक असते 
तसे त्याचातील हा गुण आहेत

फार कमी लोकांमध्ये ते असतात
अन् अधिकारी लोकांमध्ये क्वचित असतात

ते करताना शरदचा त्यात 
कुठल्याही प्रकारचा अविर्भाव नसतो 
आपण काही फार मोठे करतो 
असा आव नसतो 
ते त्यांचे जगणे असते 
शरद हा प्रेम कुळातील अन
संत कुळातील  माणूस आहे.
असे मला नेहमीच वाटते

या माणसाशी बोलताना जाणवते 
ही त्याची नम्रता ऋजुता कामसुपणा 
आणि ज्याप्रमाणे 
हिऱ्याच्या एका पैलू वरूनच 
त्याची किंमत कळावी 
तसा तो त्याच्यातील 
माणूसपणा मोठेपणा 
त्याच्या सौजन्यशील वागणुकीमधून
सहज कळून येतो

खरोखर त्याचे आभाळ अफाट आहे 
शरदची कीर्ती मी मित्राकडून 
इतर सह कर्मचाऱ्याकडून 
जास्त करून ऐकली
आणि आपण केलेल्या 
त्याच्याबद्दल ग्रह 
अगदी परफेक्ट आहे 
हे कळून आले 

खरंतर शरद सोबत 
काम करणे मी मिस केले 
त्याच्यासोबत मैत्रीचा काळ 
मला फारसा घालवता आला नाही 
पण जे काही मैत्री क्षण 
स्नेहाचे कवडसे मला मिळाले 
त्याची ओढ किती विलक्षण आहे 
हे मला तो रीटायर होताना जाणवते 

तो रिटायरमेंट नंतर 
सुखी समाधानी आनंदी राहील 
यात शंकाच नाही 
कारण तो  शरद आहे
शरद ऋतू सारखा 
आणि शरद ऋतूतील 
आकाश अन चांदण्यासारखा
शीतल सात्वीक आल्हादक
खरंच त्याच्या सारखी सुंदर गोष्ट 
जगात क्वचितच असते 

त्यामुळे हे चांदणं 
हा प्रेमाचा प्रकाश हे सौख्य 
त्याच्या सहवासात येणाऱ्या 
प्रत्येक व्यक्तीवर 
तो त्याच्या कळत अथवा नकळत 
वर्षांतच राहणार यात शंका नाही 
आणि हा वर्षाव झेलण्याचे
भाग्य घेऊन आलेल्या
भाग्यवान लोकांपैकी मी आहे 
आपण सारे आहोत 
हे आपले महदभाग्यच आहे!
धन्यवाद शरद.!!!

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

गुरुवार, २९ जून, २०२३

फांदी


ती फांदी
*****
जळत सुकत मन जातं
वठलेल्या फांदीगत
जीवनाचा रस ओला
नकळत हरवत 
म्हटलं तर अस्तित्व 
असतं कुठे लटकत 
पण जीवनाच्या वृक्षाला 
नसतो फरक पडत 
सुखाचे सागर 
भेटतात अनंत 
पण का ,नाही कळत 
सारेच असतात खारट
आकाशात उंचावले हात 
राहतात सदैव रिक्त 
असेल प्राक्तन  काही 
फांदी पुटपुटते स्वतःत 
अन् राहते वाट बघत 
शेवटच्या वादळाची 
सारा उन्हाळा अंगावर झेलत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘








मंगळवार, २७ जून, २०२३

तंतू

तंतू
****
साऱ्याच या जगाचा चालक रिकामटेकडा 
तोडतो मोडतो फोडतो रचतो उगाच दगडा 

घडती म्हणून घडती काही विचित्र आकार 
संगती वीण संगतीचा पाहता दिसे प्रकार 

का जाहलो कशास प्रश्न प्रत्येक पानास 
फुलतो फळतो गळतो नच सरतो प्रवास 

गणितात बांधलेल्या मज दिसती अपार कविता
सुख भोगते त्वचा ही उगाच रात दिन जळता  

मग हवालदिल मेंढ्या करती भक्ती बोभाटा 
उगा धावती थव्यांनी शोधीत आभाळ तुकडा 

जोडून चिंधी चिंधी पट किती थोर हा रचला 
तंतू असहाय्य पिळला परी  ठाव ना कुणाला

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

शनिवार, २४ जून, २०२३

तू आकाश


तू मुक्त आकाश
*************
तू मुक्त आकाश माझे 
मजसाठी विहराया 
झेपावते तुझ्यात मी 
नुरे कुठे माझी छाया 

तू निळा सागर माझा 
खोल कधी उतराया 
हरवते तुझ्यात मी 
माझेपण जाते लया 

तू धुंद पावूस माझा
येते तुज बिलगाया 
थेंब थेंब झेलतांना 
तुच होतो माझी काया 

तू शुभ्र प्रकाश माझा 
घेते मी रे पांघराया 
कणकण उजळतो 
चैतन्यात सजे माया 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘


प्रार्थना

 प्रार्थना
*******
मी आहे तोवर
माझ्या प्रार्थनेला
अंत नाही 
 पण प्रार्थना करणारे मन
त्याला अंत आहे 
म्हणून 
या प्रार्थनेलाही अंत आहे 

पण मी नसलो तरी 
हे जीवन असणार आहे 
हे जगही असणार आहे
म्हणून ही प्रार्थना ही 
असणार आहे.

थोडक्यात जोवर तू आहे 
तोवर जग असणार आहे 
आणि जोवर जग असणार आहे 
तो दुःख असणार आहे 
जोवर दुःख असणार आहे 
तोवर प्रार्थना असणार आहे 

म्हणजेच 
तू जग दुःख आणि प्रार्थना 
या चौकडीचा खेळ 
चालूच राहणार आहे 

तू वजा जग जग नाही 
जग वजा तू तू नाही 
तू  वजा दुःख दुःख नाही
तू वजा प्रार्थना प्रार्थना नाही 
प्रार्थना वजा तू तू नाही.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘*

गुरुवार, २२ जून, २०२३

हृदयी साठवत

हृदयी साठवत
*******
काय सांगू तुज त्याच त्याच व्यथा 
स्वामी गुरुदत्ता अवधूता ॥१
देही जन्मा येता चालणे हा रस्ता 
वाटसरा चिंता ठरलेल्या ॥२
कधी मिळे उन कधी ती सावली 
चालणे पाउली पुढे पुढे ॥३
दुःख वाळवंट सुख हिरवळ  
भोगणे अटळ हे तो रे ॥४
सारे तुझे देणे सारे तुझे घेणे 
मग ते मोजणे कशासाठी ॥५
देशील रे तू ते भोगणे सुखाने 
मुखी गात गाणे तुझे सदा ॥६
विक्रांत जीवनी  चाले दिनरात 
तुज हृदयात साठवत ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘*

बुधवार, २१ जून, २०२३

पाहते पाहणे

पाहणे पाहते
**********
पाहणे पाहते सांडूनी निरुते 
पाहीलिया त्याते 
तूचि होशी ॥
तोचि तू आपण तत्व ते तू जाण 
 न लगे साधन 
आन काही ॥
भानुबिंबे विन भासले तम 
ज्ञानदेव वर्म 
अनुवादला ॥
********
कुठलीही गोष्ट पाहायची असेल तर त्यामध्ये मी पाहायची वस्तू तो पाहणारा आणि पाहण्याची क्रिया ही तीन गोष्टी लागतात 
परंतु ज्ञानदेव महाराज म्हणतात की पाहणे आणि पाहते सांडून पूर्णपणे तू जर त्याला पाहिले तर तो तूच होशील.
परमात्मा तत्व पाहायचे असेल तर त्या ठिकाणी हा पाहणारा हरवून जायला हवा. पाहणे सुद्धा नष्ट व्हायला हवे .ज्ञान आणि ज्ञाता याचा निरास झाला पाहिजे.
 आणि एकदा तुला तुझे स्वरूप म्हणजे  तो तूच आहे हे कळले की मग आणखीन काही साधन करायची गरज नाही 
कारण जोपर्यंत भानुबिंब म्हणजे सूर्य नसतो तोवरच अंधार असतो भानुबिंब उगवल्यावर अंधार नावाची गोष्ट ही अस्तित्वात नसते.
 त्याप्रमाणे परमात्मा सूर्य ,परमात्मा रूपी ज्ञानाचा उदय झाल्यावरती इतर साऱ्या अहंकारादी वृत्ती त्यावर आधारलेले ज्ञान याचा आपोआपच नाश होतो 
हे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी उलगडून सांगत आहेत.

सामान्य माणसाला ही गोष्ट अशक्यप्राय वाटते कारण तसा प्रयत्न करू केल्यास त्याला ते साध्य होत नाही किंवा नेमके काय आणि कसे करायचे हेच कळत नाही. त्यामुळे महाराजांचा हा अभंग त्याला साधनेच्या अंगाने पाहता दुर्बोध वाटू शकतो परंतु नीट पाहिले असता सर्व साधनांचे सार या अभंगात आले आहे. अगदी सुरुवातीला ध्यानामध्ये बसल्यावर, शांतपणे बसल्यावर आपण आपले डोळे मिटल्यावर पाहणे सुरू होते अर्थात हे पाहणे आतमधले असते. तिथे स्मृती म्हणजे आठवणी विचार शब्द चित्र या विविध प्रकाराने मन डोळ्यासमोर नाचू लागते. तिथे आत मध्ये पाहणे चालू राहते आणि पाहणारा त्यामध्ये हरवून जातो म्हणजे एकरूप होतो. तर या ठिकाणी सर्वप्रथम पाहणे आणि पाहणारा या मध्ये एक दरी,भेद निर्माण होणे आवश्यक असते. म्हणजे पाहणारा हा त्या पाहण्यामध्ये रस न घेणारा त्यात न रमणारा असा  उपरा किंवा दृष्टा झाला की ती पाहण्याची क्रिया संपूर्णतः बदलते मग ते निखळ पाहणे चालू राहते. त्या पाहण्यात पाहणारा अजिबात स्वतःला विरघळू देत नाही मग ते पाहणे हळूहळू निरस होत जाते. त्याच्या लाटा कमी होऊ लागतात. आणि फक्त पाहणारा शिल्लक उरतो. पाहणे आणि पाहणारा आहे तसे पाहता वेगळे नसतात. त्यामुळे पाहणारा हा पाहणे नसताना च्या अवस्थेत गेल्यावरती जे स्वरूप असते ते आत्मस्वरूपच असते 
त्या ठिकाणी मी पण नसते केवळ शुद्ध स्वरूप अस्तित्वात असते तेच परमात्मा तत्व.
सूर्य उगवल्यानंतर ज्याप्रमाणे अंधाराचा नाश आपोआपच होतो किंबहुना सूर्याचे अस्तित्व म्हणजेच तमाचा निरास .त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय झाल्यावर सर्व ज्ञान अज्ञान विरून जाते हे ज्ञानेश्वर महाराज या अभंगांमध्ये आपल्याला उलगडून सांगत आहेत.

विक्रांत प्रभाकर तिकोणे.

माझी नर्मदा परिक्रमा

माझी  नर्मदा परिक्रमा  ***************** दिनांक 8 फेब्रुवारी 26 ते 27 जून 26 अशी 140 दिवसांची  परिक्रमा नर्मदा मैयेने पूर्ण करून...