बुधवार, १५ ऑगस्ट, २०१२

देव भक्ताचे नाते


देव भक्ताचे नाते विलक्षण
जाणले ज्याने जिंकले त्याने

काही न मागता असते मागणे
काही न देता सर्वस्व देणे

गदगदा रडणे असते सुखाने

आणिक हसणे अतिदु:खाने

अलोट प्रेमाने वेडे होणे

शहाण्यातून हद्दपार जाणे

घर जाळणे आपल्या हाताने

कटोरा घेऊन राज्य करणे

ठेवतो येथे जो स्वत:स राखून

चिंतामणी त्याने दिला टाकून

विप्र मागतो देवा हे दान

ऐसा भणंग करी गा संपन्न



विक्रांत प्रभाकर 

http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१२

चतकोर भाकर

ते घर आपुले नव्हते
तरीही  तेथे गेलो
ओरडलो हाक मारली
आत घ्या हो वदलो
किंचितसे ते किलकिलले
कुणी आतून डोकावले
चतकोर भाकर
घालून हातावर
बंदही  ते झाले .
पुन्हा एकदा तीच कथा
पुन्हा एकदा तीच व्यथा
हळू हळू मग मीही झालो
व्यावसायिक भिकारी
हिंडू  लागलो  दारोदारी
आत घ्या हो उगा ओरडत
चतकोर सारे गोळा करत
आणि आता कदाचित जर
दार उघडले तर ....
हीच  भिती दाटत आहे
चतकोरातील आनंद माझा
अन  आता वाढत आहे


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

चहा सुंदर

चहा सुंदर पिवून 
जिव्हा गेली लाचावून
झाले रसमय मन
जड़  समाधी लेवून

उष्ण चविष्ट घोट
हळू  उतरे घश्यात
वाफ स्पर्शून ओठ
झाले गंधित प्राण

पाणी साखर चहा
यात मिसळता
दुध

वर आले फेसाळून
पेय अमृत होवून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, ४ ऑगस्ट, २०१२

माझी कविता तू वाच



माझी कविता तू वाच
तुझी मी वाचतो
तू मला छान म्हण 
मी तुला छान म्हणतो

ओरडून विकली
की रद्दी ही खपते
फालतू असून ही
बालभारतीत बसते

खरतर कवीची
वहीच काय ते
नशिबही अगदी
फाटके असते

इथे मार्केटिंग
ज्याला जमते
त्याचेच फक्त
भले होते

नाव मिळते
पुस्तक खपते
कधी कधी चक्क
पारितोषिक मिळते

सगळ्यांच्या कवितेत
वेगळे काय असते
पाऊस प्रेम पक्षी अन
कुरवाळलेले
दु:ख दिसते

तुला मला सगळे
जरी ठावूक आहे ते 
तरीही तेच पुन्हा
लिहायचे असते 

एकमेकांना छान
म्हणत म्हणत
आपले कंपू
जोडत वाढवत

दुसरयाची कविता
आवडो न आवडो
वाहवेचा धुरळा
उडवायचा असतो


म्हणून म्हणतो
पुन्हा सांगतो
माझी कविता तू वाच
तुझी मी वाचतो

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१२

येऊ नकोस कधीही

येऊ नकोस कधीही
पुन्हा आता तू
असशील तेथे सदैव
पण सुखी रहा तू 

सूर तुझेनी माझे
नच जुळले कधीहि
रिझविणे माझे तुजला
जा विसरून आता तू

गीत आपुले आपण
होते सजविले छान
कडव्यात हरेक सदा
कळेना भांडलीस का तू

प्रत्येक जीत तुझीच
मी दुरावलो दूर
पण जिद्द तुझी का
न सोडलीस तू

तू पशिमेची अन 
मी पूर्वेचा सदैव
भेद मिटले कधी न
ना मिटवले कधी तू

आता तरी निदान
ठरवू अखेर आपण
जातो मी माझ्या वाटे
सुख शोध तुझे तू

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

पड पड रे पावसा


पड पड रे पावसा
गड गड रे पावसा
धड धड रे पावसा
मझिया देशी

नको रागावू असा
पाठ फिरवू असा
जीव करून पिसा
जावू दूरदेशी

सदा चुकतो आम्ही
वने तोडूनी तोडूनी
केली उजाड अवनी
तव प्रिय

लाज राजाला नाही
खंत प्रजेला नाही 
दिशा जळती दाही
धगधगत्या

काही भकास डोळे
काही खपाट पोटे
तुझ्या लावून वाटे
बसलीत

त्यांच्या ओठांसाठी
त्यांच्या पोटासाठी
त्यांच्या बाळांसाठी 
तरी पड


विक्रांत 

http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, १ ऑगस्ट, २०१२

बॉसच बोलण

तुम्हाला बॉसच बोलण
उगाच रोज ऐकाव लागत
शिव्या खाव्या लागतात
पर्सनल कामे करावी लागतात
आत राग येत असूनही
वर गोड गोड बोलाव लागत
त्याच दु:ख मुळीच वाटून घेवू नका
कारण बॉसलाही एक बॉस असतो
तोही नेमक हेच करत असतो
आज बोलणी खाणारा उद्या बॉस होतो
पण दट्ट्या मिळण त्याच
कधी काळी चुकत नसते
माणसाला सत्तेची सदैव भूक असते
त्याच मुख्य कारण हेच असते
जेवढे तुम्ही वर जाणार
तसे समीकरण बदलत जाते
शिव्या देणे जास्त होते
ऐकणे कमी होत जाते
पण ऐकाव्या तर लागतातच
बॉस होऊन तुम्ही जर
शिव्या देणार नसाल तर
वरून येणाऱ्या शिव्यांचे
ओझे उगाच वाढत जाते
नोकरी सोडून कुणाला
मग घरी बसावे लागते
अकाली कधी कुणा उगा 
निवृत्त व्हावे लागते
अर्थात घरीही सुटका नसते
तिथेही एक बॉस
तुमची वाट पाहत असतो
प्रारब्ध भोगल्या वाचून
का कोण कधी सुटतो

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...