मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८

चिंता


चिंतेचे चिंतन
*******

असे म्हणतात 
मनातल्या चिंतांचा गुंता 
कधीच सुटत नाही 
जेवढा तुम्ही सोडवायचा 
प्रयत्न कराल 
तेवढा अधिकच गुंतत जाई 

चिंतेचे जाळे 
नेहमी पकडू पाहते 
ओसाड तळ्यातील 
चकाकती मासोळी 
आपल्या नॉयलनी धाग्यात 
पण येते परत परत
गवत अन् पालकुट
घेऊन सोबत 

काळजी वाटणे 
किती साहजिक असते
प्रेमाच्या महा वस्त्राची 
जणू ती एक सुंदर किनार असते 
पण त्या काळजीची 
जेव्हा चिंता होते तेव्हा 
त्या वस्त्राची रयाच घालवते 

खरं तर चिंता करणे 
हे मनाचे एक 
नको तेउपद्व्यापी 
खेळणे असते
आकाशातील ढगात जणू
बागुलबुवा पाहणे असते

मनातील चिंतेचा गुंता 
न सोडविणे
हाच त्यापासून सुटण्याचा 
सर्वात सोपा मार्ग असतो 
कारण चिंतेचे चिंतन 
हेच चिंतेचं वाढवणें असते
अन आपण चिंता करतोय 
हे जाणवणे यातच 
चिंतेचे विरघळणे सुरू होते

चिंता देऊ शकत नाही संरक्षण 
चिंता बदलत नाही भवितव्य 
चिंता असते फक्त एक भणभण
कुस्करणारी आपले स्वर्गीय क्षण

पण या चिंतेच्या अलीकडील 
मी माझे हरवले तर 
ती चिंता जगताची होते 
अन् जगताची चिंता करणारा 
हा समर्थ होतो 
हेही तेवढेच खरे 


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुझ्यासाठी

तुझ्यासाठी ********* मनावरी गोंदलेले नाव तुझे हळुवार सांग तुला दावू कशी प्रेम खूण अलवार ॥१ डोळ्यातील चांदण्यांना तुझ्या ...