शनिवार, ८ नोव्हेंबर, २०२५

ती भेटली .

ती भेटली
*******

ती भेटली बोलली 
तशीच मुग्ध हसली
नच खंत वा सांत्वना 
कुठे शब्दात उमटली 

चार पाच विषयात 
सरे बोलणे मिनिटात 
ती होती सहजताच 
उमटली वाऱ्यात 

एक दरवळ तरीही 
दाटला मनात 
चांदण्याची मंद 
अन् झाली बरसात 

तपाचा जरी की
दुरावा काळात 
मैत्र मनातील 
उजळले मनात

बरे येते भेटू पुन्हा
वदली उगा शब्दात
नव्हते वचन किंवा 
अपेक्षा निरोपात 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .




निरोप

निरोप
*****

निरोप या घटनेला कितीतरी पैलू आणि छटा आहेत.
जसा की प्रेयसी व प्रियकराने  घेतलेला निरोप , 
हा निरोप कधीकधी त्या दिवसा पुरताच असतो . पण त्यात दुसऱ्या दिवशी भेटायची ओढ असते, आश्वासन असते. 
तर कधी प्रेमाच्या शेवटच्या टप्प्यात मिलन अशक्य ठरल्याने ,एक शेवटचा निरोप ही घ्यावा लागतो. त्यात असहायता असते.द्विधा मनस्थिती असते, कर्तव्याचे भान असते.

आई  बाप जेव्हा मुलगी सासरी जातांना तिला निरोप देतात त्या निरोपात व्यथा असते . तळहाताच्या फोडा सारखी जपलेली मुलगी दुसऱ्याच्या घरात पाठवतांना होणारी कालवा कालव आणि तिच्या भविष्यातील सुखा बद्दल आशा अन् काहीशी चिंता यांचे ते संमिश्र भावना कल्लोळ असते. 
 
युद्धावर लढायला जाणारा सैनिक ज्या वेळेला आपल्या पत्नीचा, आई-वडिलांचा आणि मुलांचा निरोप घेतो, त्यावेळेला त्या निरोपात एक भय असते की कदाचित आपण यांना पुन्हा पाहू शकणार नाही .त्यामुळे त्या निरोपात एक विलक्षण आर्तता असते. 

नवविवाहित पत्नी माहेरी जाताना  तिला
दिला जातो निरोप त्यात एक वेगळाच रंग असतो.

गावावरून येताना वृद्ध आजी-आजोबांचा निरोप घेतानाही तीच व्याकुळता मनात दाटून येते .

निरोप कधी तात्पुरता असतो तर कधी कायमचा शेवटचा असतो.

प्राणप्रिय जीवलगांच्या महायात्रेत सामील होतांना आणि त्या यात्रेची सांगता करताना घडणारा निरोप काळजात व्रण उमटवणारा असतो .

तर कधी आषाढी संपल्यावर पंढरपूरचा निरोप घेताना वा ज्ञानदेवांच्या समाधी मंदिरातून बाहेर पडताना किंवा गिरनारच्या शेवटच्या पायरीवर माथा टेकवताना अथवा पाच दहा दिवस घरात राहिलेल्या गणपती  बाप्पाला विसर्जनासाठी नेतांना उरात होणारा  तो कालवा त्या निरोपाला काय नाव द्यावे कळत नाही.

काही निरोप शब्दात उतरतात काही डोळ्यात तर काही मनात .तर कधी निरोप घ्यायचा राहूनही जातो अन् ती खंत उरी डाचत राहते.

निसर्गात तर हि निरोप व भेटण्याची शृंखला अविरत त्याच उत्कटतेने घडतांना दिसते संध्याकाळच्या सूर्याचा निरोप , पहाटे पहाटे चंद्राचा निरोप,  वर्षा ऋतू सरता सरता मेघांनी घेतलेला निरोप, 

ज्या निरोपात आपले अस्तित्व थरथरते ,आत काहीतरी हलते तो निरोप खऱ्या अर्थाने निरोप असतो अन्यथा ते गुडबाय ,हात रिवाजी हलणे असते.

विक्रांत तिकोणे 

शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५

हलाल

हलाल
******
कत्तलीस वासरांच्या प्याल्यातील दूध आहे 
शुभ्र स्निग्ध थंडगार  रक्त वासराचे आहे ॥

अधिकाधिक दूध हा हव्यास उत्पादकांचा 
मरतात बैल रेडे जग कसायाचे आहे ॥

हंबरते वासरू ते जरी का दोन दिवसांचे
सोडले जंगलात त्या भय कायद्याचे आहे ॥

जनतेस हवे किती पेढे बर्फी पनीर ते 
समोर देवतांच्या त्या आक्रोश मातेचे आहे ॥

द्विज योगीराज जैन गीत गाती अहिंसेचे 
पीडेतून उपजे ते साधन तमाचे आहे ॥

 मेजवानी दानवांची तया भय कुणाचे रे
होती हलाल गोवत्स हे राष्ट्र कृष्णाचे आहे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

चालले सोबत

चालले सोबत
**********

चालले सोबत कोण हात हातात देऊनी 
चालले सोबत कोण काठी हातात होऊनी

सावरले कुणी तव बळ पायात देऊनी 
काय घडते रे कधी हे घडविल्या वाचुनी 

पहिलीच पायरी ती जरी होती शेवटची 
पुरविली त्याने परी हौस या रे मनाची 

सवे हरेक भक्ताच्या ती माय चालत होती 
हात पायाखाली तीच हलके ठेवीत होती 

वल्गना ती चालल्याची जरी करी कधी कुणी 
देत असे शाबासकी  तीच श्रोताही होऊनी 

किती आणि काय वानू सांभाळले ठायी ठायी 
वाहिले सर्वस्व उणे कसा होऊ उतराई 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

डॉ रजनी जगताप सेवापूर्ती निमित्त

डॉ रजनी जगताप सेवापूर्ती निमित्त 
********
तुम्ही जर एकदा रजनीला भेटला 
तर तिला विसरूच शकत नाही 
तिचे वागणे बोलणे असणे वैशिष्ट्यपूर्ण आहे 
कारण ती एक हटके व्यक्तिमत्व आहे 

तिची मते ठाम आहेत त्या मता मागे 
एक वैचारिक आणि अनुभवाचा पाया आहे 
दुसऱ्याचे मत ती स्वीकारतच नाही असे नाही 
पण स्वतःची मते सहसा बदलत नाही 
केवळ जग चालते म्हणून ती चालत नाही 
कदाचित रजनी सर्वांनाच पचनी पडत नाही 
सर्वांनाच रुचत नाही पण 
एकदा का तुम्हाला तिची केमिस्ट्री कळली 
की तिच्या एवढी साधी व्यक्ती कोणीच नाही
रजनीची मते आणि स्वभाव हा मूल्याधारित आहे 
ती न्यायप्रिय आहे स्वातंत्र्यप्रिय आहे 
त्यात मांगल्याच स्पर्शही वात्सल्याचा अंश आहे 
तिच्यातील कठोरता करूणेतून आलेली आहे 
तरीही तिला जगाचे छक्के पंजे फारसे कळत नाहीतअसेच कधी कधी वाटते.
सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठांचे राजकारण तिला उमजत नाही 

कारण ती एका नदीसारखी आहे 
ती पुढे जात राहते समोर येणारे सारे खड्डे भरत 
खडकांना फोडत वाळूची खेळत 
ती कड्यावरून झेपावते वळणांना मोडते 
तर कधी संथपणे वाहत राहते 
कड्यावरून झेपावतांना मस्ती करताना दिसते
तिच्यातील न लोपलेले बालपण 
ते संथपणे वाहताना दिसते 
तिने जाणलेले जगलेले जीवन 
ते तिचे वळणे घेताना दिसते 
तिने भोगलेले टाळलेले कडवट क्षण 

ती एक नैसर्गिक योद्धा आहे 
धाडसीपणा हा तिचा अंगभूत भाव आहे 
तिने असंख्य घाव झालेले आहेत 
आणि आत्मबलाने त्यांना बरेही केले आहे 
अनेक दृष्ट अदृष्ट शत्रूंना तोंड दिले आहे  
आणि सर्वांना पुरून ती उरली आहे 

ती हळुवार मनाची संवेदनशील व्यक्ती आहे 
दुसऱ्याच्या दुःखाने विरघळणारी 
ते मनापासून दूर करण्याचा प्रयत्न करणारी 
ती कर्तव्यनिष्ठ आहे 
कामात परफेक्ट होण्याचा प्रयत्न ती करते 
ती प्रामाणिकता तिच्यात आहे
म्हणून कर्तव्य टाळाटाळ करण्याची लोक 
तिला आवडत नाहीत 

खरंतर रजनी या शब्दाचा शब्दशः अर्थ 
रात्र असा आहे अन रात्र सदैव गूढ असते 
तसेच रजनी खूपशी गूढ आहे 
रजनीत दिसत असतात 
असंख्य तारे अनेक ग्रह उपग्रह नक्षत्र 
तसेच तिच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आहेत 
काही कळतात काही कळत नाही
तरीही अल्हाद देतात 
आणि रात्री उमलतात अनेक फुले
मोगरा जाई जुई प्राजक्त निशिगंध 
जे शुभ्रता आणि सुगंध यांनी भारलेली असतात
तद्वत रजनीत ही शुभ्र सद्गुनाची सुमने 
भरलेली आहेत

काही लोक रात्रीला घाबरतात 
कारण रात्र त्यांना नीट कळलेली नसते .
जे खरोखर रात्र पाहतात जाणतात 
त्यांनाच रात्र आवडते 
तिथे जमलेल्या सारे त्यामुळेच भाग्यवान आहोत 
आपण रजनीला जाणतो तिला ओळखतो .
तिच्या निगूढतेवर आणि चांदण्यावर प्रेम करतो

 ती जीवन रसाने भरलेले सळसळते जीवन आहे
 तिच्या सेवापूर्ती निमित्त हिला खूप खूप शुभेच्छा
 अशीच आनंदी रहा हसत रहा 
आणि मुख्य म्हणजे गाणे गात रहा .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०२५

द्वारकेत

द्वारकेत
******
त्याची गाणी दूर दूर 
द्वारकेच्या तीरावर 
तिची गाणी हुरहुर 
हृदयाच्या जळावर 

लिहुनिया किती वेळा 
पुसतेच ओळ ओळ 
पुन्हा पुन्हा अंतरात 
उमटते नवी ओळ

किती ओळी किती शब्द 
भरूनिया दिशा दाही 
किती जन्म किती अंत 
ओठावर येते काही 

यमुनेचे जल जरी 
यमुना उरत नाही 
हरवते विखुरते 
नाद लय चित्र वही 

लाटावर लाट उठे 
त्याला सारे सारे कळे 
ओठ मन मिटलेले 
त्याची खोली कुणा कळे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०२५

पालखी

पालखी 
***
दत्त कुणा भेटतो का 
भेटतो वा साईनाथ 
वाहूनिया पालखीला 
चालूनिया घाट वाट

दत्त कुणा कळतो का 
करूनिया थाटमाट
सुटते का अंतर्गाठ 
करूनिया पूजा पाठ

चालण्यात तप घडे 
चालणे ते कुणा कळे
माळेमध्ये जप चाले 
स्मरणे ते कुणा वळे 

जीवनाशी गाठ पडे 
जगणे घडले तर 
अन्यथा येतेच आणि 
पुन्हा ती जातेच लाट 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .


रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...