मंगळवार, १६ मे, २०२३

तवंग


ओझे
*****
तनामनावर लादलेले ओझे 
कुठल्या जन्माचे कळेचिना ॥ १
ओझ्याखाली जीव होतो कासावीस 
सुख सारे ओस वाटतात ॥२
एक पेटलेली आग अंतरात 
जाळे दिनरात आतृप्तीची ॥३
मिळेल धनभोग म्हणे छान जग 
परि मी तवंग  पाण्यातला ॥ ४
वाहता वाहतो पाणीयाच्या वाटा 
पाणी नच होता येत मज ॥५
पुढे काय गती ठाव नसे स्थिती 
दत्ता तव चित्ती असे ते रे ॥६
जया सुरवात तया असे अंत
पाहतो विक्रांत उगा क्षोभ ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

रविवार, १४ मे, २०२३

असू दे


असू दे 
******
अजूनही ओढ तुझी मनातून जात नाही 
अजूनही रूप तुझे डोळे हे पुसत नाही ॥

जगते जरी मी इथे कशाला कळत नाही 
हे एकटेपण माझे आता पेलवत नाही ॥

येशील तू याची जरी मुळीच शक्यता नाही 
आशा पालवी आतली तरीही जळत नाही ॥

तू स्वप्न होते साजरे तू श्वास माझे आंधळे 
हरवले रंग तरी जाग येता येत नाही ॥

तू गीत माझे व्याकुळ तू भाव माझे आतुर
विसरले शब्द तरी धून जाता जात नाही ॥

ठरवले दारी तुझ्या मी कधी येणार नाही 
उरातील ओढ तुझी कश्याला बधत नाही ॥

जाणते मन जरी रे  हवे ते मिळत नाही 
असू दे जखमा उरी ज्या कधी भरत नाही ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शनिवार, १३ मे, २०२३

दत्ता तुझी वाट

दत्ता तुझी वाट
***********

दत्ता तुझी वाट नाही सापडत
राहतो चुकत जीव सदा ॥१

दत्ता तुझी प्रीत नाही उगवत 
राही भटकत प्राण उगा ॥२

दत्ता तुझे रूप नाही रे दिसत
कळ काळजात उठे नित्य ॥३

दत्ता तुझे शब्द कानी ना पडत 
नाही उमटत नाभीकार ॥४

धिग जीणे माझे दत्ताविन वाया 
विक्रांतही काया सुटो आता ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शुक्रवार, १२ मे, २०२३

नावेक भज


नावेक भज
*********

नावेक भज रे भज तू दत्त रे 
काढून चित्त रे 
संसारीचे ॥१
क्षण क्षण दत्त होतील मिनिट 
तेही घटीकात 
साठतील ॥२
होता आठवण दत्त व्यापी मन 
चैतन्य चांदणं 
अंतरात ॥३
सोस मागण्याचा वृथा जगण्याचा 
हरवेल साचा 
सहजीच ॥४
नाम नाम जोडी जप कर पोटी 
सुखाची विरुढी 
उगवेल ॥५
विक्रांत दत्ताला करी विनवणी 
अन्य आठवणी 
देऊ नको ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

बुधवार, १० मे, २०२३

मैत्रीचं झाड


मैत्रीचं झाड 
*********
तो माझा तरुण मित्र 
तावातावाने सांगत होता 
तिने मला चक्क ब्लॉक केलं 
आणि सांगते की पासवर्ड विसरला म्हणून.
मी काय एवढा मूर्ख आहे.
ते न समजायला

तेव्हा मी त्याला म्हटलं 
तर मग तू काय करू शकतोस.
तिच्या परवानगीशिवाय 
तिच्या वैयक्तिक जगात 
कसा काय प्रवेश करू शकतोस.

तो म्हणाला, 
नाही पण, मला कारण हवं होतं 
माहित व्हायला हव  होतं की
माझं काय चुकलं ?
त्यावर मी त्याला विचारलं
आणि समजा तुला ते कळलं 
आणि ते तुझ्या पचनी नाही पडलं 
तर तू काय करशील?

हममssssss
तो उद्गारला ,
पण त्याच्याकडे उत्तरच नव्हतं

मग मी त्याला सांगितलं ,
हे बघ ,कुणीतरी सहज आवडणं
आपण त्याच्याशी बोलणं 
कुठेतरी भावनिक रित्या गुंतणं
ही मानवी मनाची सवय आहे.
बऱ्याचदा गरजही असते.

पण हे लक्षात घे 
मनच मनाचं खेळणं असतं 
ते दुसऱ्याच्या मनाशी खेळतंय
असं वाटत असलं तरी 
ते स्वतःशीच खेळत असतं 

म्हणजे ते बोलणं चालणं गप्पा मारणं 
वाईट आहे असं नाही.
विशिष्ट मर्यादेपर्यंत ते ठीकही असतं 
पण कुठलीही मैत्री 
अपेक्षेच्या पारावर उभी असेल तर 
तिथे जमा होतात फुटकळ विचार
अपेक्षा, स्वामित्वाची जाणीव 
जमते हक्काची, विडी काडीची मैफिल .
होते निरर्थक धुराची घुसमट ॥

एकदा निरपेक्ष मैत्री करून बघ.
ती बोलतेय तोवर बोल.
तुला वेळ असेल तेव्हाच बोल.
कधी विचार व्यक्त होतील 
कधी मनोगत व्यक्त होईल 
कधी सुख दुःखाच्या गोष्टी उलगडतील 
कधी शुभेच्छा मिळतील 
कधी सल्ले विचारले जातील.

सगळ्यालाच नाही जमत 
तोंडावर स्पष्ट बोलायला 
डोळ्यासमोर काही सांगायला 
तेव्हा ते घेतात आधार 
या दूरस्थ माध्यमाचा .

अरे माझ्या तरुण मित्रा,
ती सुद्धा मैत्रीच असते 
कधी रुजते बहरते
कधी मरगळते कोमेजते 
कधी घाबरते टाळते 
कधी उन्मळूनही पडते.

म्हणून काय झालं.
मैत्रीच कुठलच रोप 
कधी वाया जात नसत
कुठलं रोप या जगाला 
क्षणभर हिरवाई देत
कुठलं रोप सुगंधी फुलं देतं 
क्वचित कुठलं रोप विशाल होतं 
फळांनी बहरून जातं 

कुठं कुणाचं काय होणार असतं 
ते आपल्या हातात नसतं 
आपण फक्त 
त्या रुजलेल्या अंकुरासारखं 
उगवणाऱ्या रोपासारखं 
फळणाऱ्या झाडासारखं 
निरपेक्ष व्हायचं असतं

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

सोमवार, ८ मे, २०२३

पानगळ .


पानगळ 
******
जीवनाचा एक अटळ अपरिहार्य हिस्सा असते पानगळ, 
जीवन वृक्षावरील समस्त सृजनाचे 
होणे विसर्जन आणि शेवटी 
तो जीवनाचा महावृक्षाचेही पडणे उन्मळून .
त्यालाही असणार अंत. 
अन जिथे अंत आहे तिथेच दिसते होतांना सुरुवात 

पृथ्वी आप तेज वायू आकाश
तीच तत्त्व घेतात पुन्: पुन्हा  आकार. 
खरंतर हरक्षणी 
पण भासतात दृश्यपणे कालांतराने 
अन् राहतात फिरत. 
मातीतून रोप रोपाचीच माती 
पानगळ असते त्याचीच छोटीशी आवृत्ती 

जीवाकडून घडवले जातात जीव 
वृक्षाकडून घडवले जातात वृक्ष 
आणि विश्वातून घडवले जाते विश्व 
पण शेवट ? तो माहीत नसतो कोणालाही
 डायनोसॉरचा अंत अपरिहार्य होता 
तसाच माणसाचा ही असणार का ? 
अर्थात ती फार लांबची गोष्ट आहे, 
सध्या तरी मला माझ्या अंताची चिंता केलेली बरी चिंता करूनही असं काय मोठं होणार ? 
जावं तर लागणारच, अंत तर होणारच, 
पानगळ तर ठरलेलीच. 

खरंतर मरायचे कुणालाही नसते ,
मलाही मरावसं वाटत नाही 
पण मला मरणाची भीतीही वाटत नाही. जीवनाचा स्वीकार मरणासकट केला आहे मी 
तेवढे चिंतन मनन तर केले आहे मी.
पण मला फक्त एकच चिंता आहे. 
एकच प्रश्न आहे .एकच गोष्ट जाणणे आहे 
की ही सारी पानगळीची जन्ममरणाची 
कटकट कुणी आणि का सुरू केली  ?
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

रविवार, ७ मे, २०२३

प्राजक्त

प्राजक्त 
********
देह कोवळे 
मन कोवळे 
फुल फुलले 
प्राजक्ताचे ॥

गंध कोवळा 
रंग कोवळा 
स्पर्श कोवळा 
प्राजक्ताचा ॥

बहर दाटला 
जगती भिनला 
जन्म कळला 
प्राजक्ताला ॥

कधी उमलले 
कधी ओघळले 
कुणा न  कळले 
प्राजक्त ते ॥

अलगद आले 
अलगद गेले 
स्वप्नच झाले 
प्राजक्त ते ॥

तुझ्या सारखा 
तू मजला कर 
ठस खोलवर
प्राजक्ता रे ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...