मंगळवार, २० एप्रिल, २०२१

येणे जाणे

येणे जाणे
*******

तुझे येण्याविन येणे
तुझे जाण्याविन जाणे

तुझे असणे नसणे
मनी जागवते गाणे 

काळ मिटलेली स्पप्ने
तरी हृदयी तराने 

माझे मजला कळते 
माझी नच मी उरते 

तुला डोळी साठवुन 
जाते तुझीच होवून

शब्द असतात काही 
रूप डोळीयाच्या डोही

जीव  क्षणी शांत होतो
पुन्हा विरही झुरतो

देही असुनी विदेही 
नाव प्रीतीस या नाही 

वाटे जावे हरवून
काळ्या डोहात बुडून

तुझे येणे खरे नाही 
तुझे जाणे खोटे नाही

दृश्य भास प्रकाश ही
मज कळत का नाही

माझे तुझ्यात असणे
सवे तुझ्या हे जगणे

देह शब्दांची मिळणी 
हि तो द्वैताची खेळणी 
***
भक्ती विक्रांता भेटली
राधा राणीच्या पावुली

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

रविवार, १८ एप्रिल, २०२१

दत्ता वाचून


दत्ता वाचून 
*******

दत्ता वाचून काहीही 
भजू नको माझ्या मना
सोड सारी स्वप्ने खोटी
सोड सार्‍या रे कल्पना ॥

दुनिया सारी क्षणिक 
जगणे आहे मायिक 
त्यात गुंतून वाहता 
जगणे होईल धिक् ॥

जसे होईल तसे रे
तुवा करावे साधन 
बघ भेटत जाईल 
पुढचे मार्गदर्शन ॥

शोधेल तया भेटेल 
मागेल तया मिळेल 
सुत्र हे तो सनातन 
बघ तुजला कळेल.॥

दत्तासी शरण आला
अन जन्म फुका गेला
बघ जगती विक्रांता 
कुणीच नाही दिसला ॥

एका दत्ता ठेवि चित्ती
दत्ताधिन करी वृती
हरतील क्लेश सारे 
उपजता मनी भक्ती॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘







शनिवार, १७ एप्रिल, २०२१

शब्द पडीक


शब्द पडीक
********

शब्दातला पडीक मी 
शब्दामध्येच जगतो 
शब्दातून हिंडतो मी 
शब्द उरात पेरतो 

प्रतिभेचा दावा नाही
अभ्यासी आवड नाही 
या शब्दांनी सुखावतो
शब्द श्री चा राव नाही 

शब्द प्रेमी मित्र माझे 
शब्दांच्याच नात्यातले
असेच हे खुळावले 
गडी याच खेळातले 

शब्दांचा मी ऋणी सदा 
त्यांनी नवजन्म दिला 
सुंदर करूनी जग 
जगण्याला अर्थ दिला 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘


शुक्रवार, १६ एप्रिल, २०२१

काच

काच
****

फुटलीच काच अंती
फुटणार बघ होती 
विझलीच बघ अंती 
विझणार आग होती 

हा खेळ चाललेला 
घडण्या नि मोडण्याचा 
असे अंतहीन किंवा 
एकाच अरे क्षणाचा 

घडणे हे मोडणेच 
मोडे तेही अखंडीत
भ्रम दाटले मनात 
उगा वाहती जगात

बाप दत्त असे स्पष्ट 
भरला कणाकणात
वेड कुठल्या खुळ्याच 
शोधे ब्रह्म आरशात 

क्षण पुसे काळ होई
दिसतात लक्ष युग
विक्रांते जाणली मेख
हरपले  सारे जग


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

दत्त कृपेने धन

दत्त कृपेने धन
***********

दत्त कृपेने धन येते 
दत्त कृपेने धन जाते ॥

आलो होतो रित्या हाताने 
जाणारही ना रित्या हाताने ॥

तर मग तृष्णा कुठून येते 
धन हरवता रडू  का येते ॥

सारे काही दत्ता दिधले 
आता माझे काही उरले ॥

खाणे बोलणे कुणी भेटणे
सुख दुःख नाही मध्ये वर्तने॥

माझे काहीच नाही इथले 
प्रारब्ध ही मी तया वाहिले ॥

मर्जी तयाची तर भोगतो 
मर्जी तयाची तो बदलतो ॥

दत्त चरणी मस्त मजेने 
प्रेम भारले म्हणतो गाणे ॥

दत्त कृपेचा वाहतो वारा 
म्हणे विक्रांत शीड उभारा ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

बुधवार, १४ एप्रिल, २०२१

वारूळ महाल




वारूळ महाल
***********
कुठेतरी केव्हातरी 
दिसे वाट चुकलेली 
नागमोडी वळणात 
नजर ती झुकलेली 

हरवली फडफड 
हृदयाची धडधड 
वाहुनिया पाणी गेले 
नदीकाठी तोच वड

मिटलेल्या चुका तरी 
हात असे काचलेले
डोळ्यां मागे अंधारात 
एक चित्र लपलेले 

वादळाचं वेलीची ती 
धडपड जगण्याची 
स्वानंदात वृक्ष धुंद 
वांछ्या तया संपण्याची 

कुणा काय सांगू किती 
जडावले शब्द तेही 
पाखरांनी रिते केले 
कचराच घरटे ही 

अरे देवा नशिबाच्या 
असे काय खेळणे हे
वारुळाच्या महालास
बुडवणे बरे नव्हे .

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

डॉ.बाबासाहेब

डॉ.बाबासाहेब 
🌾🌾🌾


काल रात्री बारा वाजता 
अचानक 
आकाशात उडू लागले फटाके 
दुमदुमू लागले आवाज 
आश्चर्य वाटले 
दिवाळी !
अशी अचानक 
खिडकीतून डोकावून बाहेर पाहिले 
तर काही वस्त्यांमध्येच 
ही धामधूम चालू होती.
आणि लक्षात आले 
अरे आंबेडकर जयंती सुरू झाली 
हि भिमाच्या अनुयायांची दिवाळी आहे.

बाबासाहेबांविषयी इतकी श्रद्धा 
इतके प्रेम आदर 
या समाजामध्ये निर्माण झाला आहे 
की ते बाबासाहेबांना 
निश्चितच 
प्रेषित मानू लागले आहेत 
देव मानु लागले आहेत

प्रेषित येतो 
आणि बाहेर काढतो लोकांना 
त्यांच्या दुःखातून दैन्यातून 
देतो ज्ञानाचा मुक्तिचा प्रकाश
प्रदान करतो माणुसकीचे हक्क 
वागवतो माणूस म्हणून . .
माणसाला यापेक्षा 
निराळे तरी काय हवे असते.

कारण मानवी मनाला 
हवे असते एक दैवी स्थान 
पूजनीय स्थान 
जे त्यांच्या आत्मसन्मानाला 
अभिमानाला 
उंचावर नेऊन ठेवेल 
हवे असते
एक श्रद्धास्थान .
आणि जर 
एक नष्ट झाले तर 
तिथे दुसरे उभारावेच लागते 

कारण मानवी मन 
नाही राहू शकत त्याशिवाय 
माणसाला हवा असतो 
प्रेषित 
महापुरुष 
पूजा करायला 
इथून तिथून सर्व जगाच्या पाठीवर

 हिंदू धर्म ,संस्कृति 
यांना नकार दिल्यावर 
झालेली पोकळी भरून काढणे 
आवश्यकच होते .
त्यामुळे बाबासाहेबांना देवत्व मिळणे 
क्रमप्राप्त आहे .
कदाचित त्यांना स्वत:ला 
ते अभिप्रेत नसेलही.

अर्थात बाबासाहेब 
महामानव होते यात शंका नाही
कित्येक शतकानंतर 
अशी विभुति जन्मास येते .

पण
मला भिती वाटते 
ती वेगळ्याच गोष्टींची
कारण ज्या क्षणी 
एक मोडून दुसरे
नवे श्रद्धास्थान निर्माण केले जाते
त्याक्षणी माणसाचे मन  
एकांगी होते 
अधिक कट्टर होते 
आणि जुने श्रद्धा स्थान 
पुसून काढण्याचा 
आटोकाट प्रयत्न 
त्या मनाकडून केला जातो

सामाजिक राजकीय गरजेमुळे 
कदाचित ते बर्‍याचवेळा
अप्रकटपणे प्रकट होते
पण आपल्याच ग्रुपमध्ये 
ते अधिक  तीव्रतेने 
अधिक जाहीरपणे मांडले जाते
प्रकट केले जाते

कदाचित एका म्यानात 
दोन तलवारी राहात नाहीत 
तशाच एका मनात 
दोन श्रद्धाही राहत नसाव्यात
दोन संस्कृती रहात नसाव्यात
किंबहुना त्या तशा राहू नयेत 
अशीच काही समाज प्रमुखांची 
नेता मंडळींची इच्छा असते.

खरतर बाबासाहेब 
एका समाजाचे वर्गाचे असे नाहीत 
तर ते या भारत भूमीचे सुपुत्र आहेत
इतके दूरदर्शी
इतके विद्यावान बुद्धीमान
सूक्ष्मातिसूक्ष्मात जाऊन 
विचार करणारे विचारवंत 
माणुसकीने ओथंबून गेलेले 
महामानव.

पण त्यांना विभुतिपुजनासाठी
स्वत:च्या स्वार्थासाठी
केवळ मुर्ती म्हणुन वापरले
तेव्हा .
त्यांना कट्टरतेच्या झेंड्याखाली  
आणून स्थापित केले जाते 
तेव्हा
ती न  भरलेली दरी
मला जाणवत राहते 
पुन्हा पुन्हा .

बाबासाहेबांवर गौतम बुद्धावर  
अन मानवतेवर 
अत्यंत प्रेम करणार्‍या  
माझ्यासारख्या
वर्णाश्रम नाकारणार्‍या 
पण हिंदुच्या आत्मज्ञानाधारित
शिकवणुकीवर  
जन्म जगणार्‍या 
व्यक्तिला खरेच खुप वाईट वाटते.

बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम .!!


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘





रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...