शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०१५

धुवांधार ॥ नर्मदे हर ॥




झोकूनिया देह इथे हा
परतून पुन्हा न यावे
बिंदूने बिंदूत जिरावे 
कणकण इथला व्हावे

रेवामैयाच्या कुशीतील  
बालक इवला मी व्हावे
पुन्हा पुन्हा परिक्रमा नि
जन्म सारे इथेच यावे   

पद चुंबित साधकांचे
पथ अलवार करावे
लक्ष्य अलक्ष्य लिंगांना
अविरत मिठीत घ्यावे

ओमकाराचा नाद तिच्या
प्रपातात विरघळावे
पुत्र तिचा मी पुत्र तिचा मी
जिणे एवढेच राहावे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



बुधवार, ९ सप्टेंबर, २०१५

बहुदा हिशोब संपला असावा ...







मी वाचत बसायचो तिच्याशी मारलेल्या गप्पा
whats app वरच्या facebook वरच्या
पुन:पुन्हा.. ऑफलाईन झाल्यावर
सेव्ह करून ठेवलेल्या वर्ड फाईल मधल्या  
त्यात होते तिचे उलगडलेले मन आणि स्वप्न
तिच्या काळजावर झालेल्या जखमा
आणि दुरावल्या जीवलगांच्या गोष्टी
तिने सांगितलेली हृदयस्थ गुपिते ..
मी तिचे केलेले सांत्वन घातलेली समजूत 
कधी केलेल्या काही चेष्टा घातलेली कोडी
कधी केलेले कौतुक दिलेल्या सूचना
सावध केलेले चुकापासून अन दिले होते सल्ले ...
आणि हळू हळू मला दिसू लागले   
माझे तिच्यात नकळत अडकणे  
अगदी कटाक्षाने टाळूनही
बोटातून निसटणारी वाहवा अन हळवे शब्द
खरतर फक्त मैत्री होती ती सीमा रेखा आखलेली
तिच्या गोष्टीतून बोलण्यातून अन वागण्यातून
तिने दिले मला हजार शब्द लाख कल्पना
तरीही पडलेच काही तडे काही ओरखडे
समज गैरसमजाचे दाटले गर्द धुके
आणि एक दिवस दिसलीच ती संपलेली मैत्री
आणि झालेली अखेर त्या साऱ्या गप्पांची
वाचता वाचता अखेर मलाही जाणवला 
त्यातील फोलपणा मूर्खपणा अपव्यय वेळेचा
आणि मग त्या साऱ्या फाईलींना
मी दाखवला रस्ता रिसायकल बिनचा  
पण डिलीट करूनही सारंच डिलीट होत नसते
मन म्हणजे संगणकाची मेमरी नसते
राहील ते सारे पडून आत कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात
उमटेलही कधी कुठल्या कवितेत
कारण शेवटी जीवनात जे घडायचे ते घडते
जणू काही ते जुनेच देणे घेणे असते
अन बहुदा आता हा हिशोब संपला असावा !

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




 

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०१५

येऊर ..(जंगलातील खेडे )


 

हिरव्या जमीनी  
कुणाच्या ताब्यात
घालून कुंपणे
बसल्या वेढ्यात

फाटका मालक
गेला देशोधडी
अथवा घरात
झाला घरगडी

नव्वद वर्षांचा
जाहला करार
गेली खुळखुळ
दिवसात चार

बांधले महाल
कुणी चमकीले
आश्रम इमले 
कुणी सजविले

सारे राजरोस
धन जोरावर  
अन सरकारी
कृपेची नजर

आता तर राजा
बदले नियम
होवून दलाल
मागतोय दाम   

अन हिरवाई
सारी झाकोळली
खाचर गाडली
सिमेंटच्या खाली

वाढतेय प्रजा
भुकेले बिल्डर
जणू टपलेला
बोका लोण्यावर

उरेल कागदी
काहीसे जंगल
मग माणसाचा
वंश ही मरेल

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

 


शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५

विद्ध मरण






तसे तर हे जीवन
जात आहे ओघळून  
हळू हळू अंधार मी
घेत आहे पांघरून

ती गाणी कालची तू
नकोच दावू म्हणून
प्रत्येक तान त्यातली  
बसली आहे रुतून

जमले तर ये जरा
किंचित वेळ काढून  
चार बाण रुतेलेले
हलकेच घे काढून

तेव्हाही दुखणारच
दु:ख ते वेगळेपण
साचलेले नसेल गं  
तयात विद्ध मरण

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...