गुरुवार, ६ मार्च, २०२५

नर्मदा माईस (लळे)

नर्मदा माई (पुरवी ग लळे)
*********
माई सुख माझे मजला दिसते
कुठे जायचे ते गंतव्य कळते ॥१

तुझिया किनारी जन्म हा सरावा 
ठसा मी पणाचा पुसूनिया जावा ॥२

तुझिया संनिधी देह हा पडावा 
कण कण माझा तुझा अंश व्हावा ॥३

हळू हळू सारे इथले सुटावे 
पाश मी बांधले पिळ ही तुटावे ॥४

म्हणतात साधू सारे तू ऐकते 
मनातील आस सदा पुरविते ॥५

तव तीरी यावे तव रूप व्हावे 
तुझ्यासाठी जन्म पुन: पुन्हा घ्यावे ॥६

इतुके मागणे मागतो कृपाळे 
माय लेकराचे पुरवी ग लळे ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, ५ मार्च, २०२५

अट

अट
***
कधी शब्दावाचून कळते प्रीत
कधी शब्दावाचून अडते प्रीत ॥१
करून दूर ते लाखो अडसर 
मौन फुलांनी हळू भरते अंतर ॥२
नजर नजरेस भिडल्यावाचून 
स्पर्शात झंकार उठल्यावाचून ॥३
आत कळते कुणा खोलवर 
जीव जडला असे कुणावर ॥४
पण बंद वाटा कधी झाल्यावर 
होय हरीणीची व्याकुळ नजर ॥५
जीवलग असे पैल तीरावर 
प्रवाहाला नच दिसतो उतार ॥६
काय करावे ते नच कळते 
स्वप्न समोर परि ना मिळते ॥७
त्या विरहाचे तप्त आर्त सुर 
चांदण्यास ही करतो कापूर ॥८
वर्षा गीत ते ग्रीष्मास कळते
पळसही फुलतो उकलून काटे ॥९
होते पखरण  ग्रीष्म फुलांची  
नदी आटते जन्मों जन्माची ॥१०
पण ते गाणे व्हावे बहु कातर 
जणू याचीच वाट पाहे चराचर ॥११
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 



मंगळवार, ४ मार्च, २०२५

नटपण

नटपण 
*******
स्टेज बदलते नाटक बदलते 
पात्र बदलतात प्रवेश बदलतात 
पण नट 
नट तोच असतो तसाच राहतो 
संवादात घुटमळलेला 
वेशभूषेत अडकलेला 
अन्  ते पाठांतर येते ओठी उगाच 
कुठून तरी कुठल्यातरी क्षणी 
जे पाहणार नसते ऐकणार नसते कुणी 
हे मनातील नाटक संपणे 
किती कठीण असते नाही.

खरंतर एकच नाटक 
तरी किती वेळ करायचे
जास्तीत जास्त रौप्य महोत्सव होणे 
म्हणजे खूपच झाले की
आता नवे नाटक नवे संवाद 
नवे पाठांतर हवे असते .

नवे नाटक गाजेलच असे काही नाही 
चालेलच असे काही नाही 
पण नटाचे नटपण स्वस्थ बसत नाही 
ते राहते नव्या संहिताच्या शोधात 
दिग्दर्शकला गळ घालत 
अन् घेऊ पाहते तोच गर्भ पिवळा 
सोनेरी प्रकाश झोत अंगावर 
तो जिवंत असण्याचा आभास
हवा असतो त्याला आपल्या मनावर

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita

https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, १ मार्च, २०२५

जाता जाता


जाता जाता
**********
जाता जाता शेवटी शेवटी टेकवला माथा 
त्या म तु अगरवाल रुग्णालयाच्या 
शेवटच्या पायरीवर 
अन भास झाला मला 
गिरनारच्या पायरीचा क्षणभर
तो तसाच आशीर्वाद हळुवार 
विसावला मस्तकावर 
तो तसाच भास उमटला माझ्यावर
स्पर्श  त्या हातांचा डोक्यावरून फिरणारा 
जाणवला मला पुन्हा एकवार 

तर इथेही तूच होतास  सतत माझ्यासोबत
 साऱ्या वादळात मला साथ देत 
कृतज्ञतेने थरारले मन हृदय आले भरून 
डोळ्याच्या कडा ओलावून निघालो मी तिथून 
मग तू मला दिसला का नाहीस आजवर 
उमटला प्रश्न मनात 
आणि असंख्य चेहऱ्यांनी
मनाचा गाभारा गेला उजळून 
दत्तात्रया किती जपलेस तू मला 
सांभाळलेस किती रूपातून 
हे रुग्णालयच गिरनार करून 
हे करुणाकरा मी उगाच तळमळत होतो 
साऱ्या पौर्णिमा व्यर्थ जातात म्हणून
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५

नोकरीचा प्रवास

नोकरीचा प्रवास 
************
हा प्रवास सुंदर होता 
या महानगरपालिकेतील नोकरीचा 
हा प्रवास सुंदर होता 
आणि या सुंदर प्रवासाचा हा शेवटही 
अतिशय सुंदर झाला. 
सारेच प्रवास सुखदायी नसतात 
काही भाग्यवान प्रवासीच प्रवासाचे सुख अनुभवतात 
प्रवास म्हटले की रस्ता ,रस्त्यावरील खाचखळगे अवघड वळणे 
भांडखोर सहप्रवासी गर्दी हे अपरिहार्य असते 
कधीकधी बरीच वाटही पाहावी लागते 
तरी मनासारखी गाडी 
मनासारखी ठिकाण मिळत नाही 
ते तर माझ्याही वाट्याला आले.

पण तरीही मी खरंच भाग्यवान आहे .
मला या प्रवासात जे असंख्य सहप्रवासी भेटले 
ते मला आठवत आहेत  आनंद देत आहेत.
कुणाचा सहवास प्रदीर्घ होता 
तर कुणाचा काही अल्प काळासाठी होता.
 काही प्रवासी स्मृती मधून अंधुकही होत गेले आहेत तर कोणी जिवलग झाले आहेत
..
म्हणजे मी कुणाशी भांडलोच नाही 
रागावलोच नाही असं नाही 
साधारणत: या ३३ वर्षांमधील
दोन भांडणे मला नक्कीच आठवतात.

खरतर रागवणे हा माझा पिंड नाही
पण व्यवसायिक रागावणे हा तर 
आपल्या जॉबचा एक हिस्साच असतो 
ते एक छान नाटक असते 
ते वठवावे लागते आणि ते वठवताना 
आपण एन्जॉय करायचे असते 
त्यात बुडून जायचे नसते
हे मला पक्के पणे कळले होते.
पण तो अभिनय करायचे संधी 
मला क्वचितच मिळत होती.

आणि रागवण्यापेक्षाही 
समजावण्याने आणि प्रेमाने सांगण्याने 
माझे काम अधिक वेगाने 
आणि अधिक चांगली झाली 
असा माझा अनुभव आहे.
..
आणि समोरच्या माणसातील 
अवगुणा पेक्षाही त्याच्यातील गुण दिसू लागले 
आणि त्याचा वापर करता येऊ लागला 
तर फायदा आपलाच होतो.

आणि बॉस बद्दल सांगायचे तर 
मला इथे खोचक बोचक रोचक आणि टोचक असे सर्व प्रकारचे बॉस मिळाले .
ते तसे असणे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होता.
पण सर्व बॉस पासून 
मी सुरक्षित अंतर ठेवल्यामुळे 
मला खोच बोज आणि टोच जाणवली नाही.
(अपवाद डॉ ठाकूर मॅडम . त्या अजात शत्रू असाव्यात)

इथे मला केवळ डॉक्टर मित्रच नाहीत तर 
फार्मासिस्ट लॅब टेक्निशियन क्लार्क नर्सेस 
वार्ड बॉय टेक्निशियन आणि स्वीपर 
यात ही मित्र भेटले.
आणि ही मैत्री केवळ परस्परांना दिलेल्या 
आदर सन्मानावर अवलंबून होती.
मदतीला सदैव तयार असलेल्या 
होकारावर अवलंबून होती.
..
तर या नोकरीच्या पर्वा कडे 
मागे वळून पाहताना 
या शेवटच्या दिवशी मला जाणवते 
की आपण केलेली नोकरी छानच होती.

त्यामुळेच या कालखंडात भेटलेल्या 
सर्व मित्र सहकारी वरिष्ठ यांच्यासाठी 
मन आनंदाने प्रेमाने आदराने भरून येते.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२५

वृक्ष

वृक्ष 
*****
रुजलेल्या झाडागत 
प्रकाशाचे गाणे गात 
गळेपर्यंत पानांची 
आनंदे मी देतो साथ

अंधाराची खंत नाही 
प्रकाशाची हाव काही 
जगण्याला सादर मी 
अवघा स्वीकार देही

येतात आणि जातात 
सहा ऋतू आभाळात 
थांबवणे लांबवणे 
नाही मनी ना हातात 

पार कुणी सजवले 
कुणी वा ओरबाडले
कुणी दिले कुणी नेले 
कोंब फुटतच राहिले 

पण कधी मुळांनाही
ही माती निरोप देते
शिरातून वाहणारे 
जीवनही थंडावते 

जुने खोड हरवते
नवे बीज अंकुरते 
नवे पक्षी नवे गाणे 
त्याच जागी उमलते

माझे गाणे सरू आले 
पोकळीत विसावले 
सावलीचे सुर त्याचे 
दिले जे ते देता आले 

कुणा हाती फुल फळे 
कुणा पाचोळा रे  मिळे 
आभाळात वृक्ष डोळे 
उधळणे तया कळे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 



 


मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५

रेखा चौधरी (pharmacist)श्रद्धांजली

रेखा चौधरी (pharmacist) श्रद्धांजली 
*****"
आज कळले रेखा चौधरी गेल्या.
धक्काच बसला मनाला .
२०-२१ ला म्हणजे आता आताच रिटायर झाल्या होत्या त्या .
दुसरी इनिंग सुरू झालेली नुकतीच .
त्यांची उंच शिडशिडीत 
 उत्साहाने भरलेली मूर्ती .
भावनांचे प्रकटीकरण 
ततक्षणी करणारा चेहरा.
चष्मा मागील वेध घेणारे डोळे 
विलक्षण नम्रता प्रामाणिकपणा 
कर्तव्यनिष्टता स्पष्टवक्तेपणा खरेपणा स्वाभिमानीपणा कष्टाळू वृती 
डोळ्यासमोर उभे राहतात 
नवीन शिकण्याची त्यांची इच्छा 
काहीही आत्मसात करण्याची वृत्ती 
एकूणच स्वतःचे शंभर टक्के झोकून देऊन 
काम करण्याची स्वभाव 
अतिशय गुणी व्यक्ती होत्या त्या 
आज आपल्यात नाही हे खरंच वाटत नाही 
काल कालच त्या रिटायर झाल्या
तरी तो टेबल त्या खुर्चीवर 
त्या कॉम्प्युटरच्या मागे बसलेली त्यांची मूर्ती 
काल पाहिलेल्या घटना सारखी ताजी आहे 
त्यांनी जीवनात पचवलेले दुःख क्वचितच ओठावर आणले 
आणि ओठावर आलं तेव्हा त्यांची सोशीकता पुन्हा पुन्हा मनावर ठसली
 मग ते लाडक्या मुलाची झालेली अचानक एक्झिस्ट असो 
वा कर्करोगाने केलेले आक्रमण असो
दुःख तर होते मनाला निराशाही येतेच 
पण ती पचवणे आणि उभे राहणे 
या दुर्लभ गुणांचे खंबीरतीचे दर्शन त्यांच्यात झाले 
त्यांनी कुठल्याही लढाईत कधीही माघार घेतली नाही 
पराभवाची चिंता केल्याशिवाय खंबीरपणे त्या उभ्या असत आपल्या भूमीवर ठामपणे 
आणि मानवी मनाची व जीवनाची जीत ही
जिजुविषेत असते.
अखेरच्या क्षणापर्यंत न मिटणारी 
ती  जिजूविषा त्यांच्यात होती हे निर्विवाद.
आमच्या मनात एमटीआगारवालच्या 
न मिटणाऱ्या आठवणी आणि व्यक्तीमध्ये त्या   कायम राहतील यात शंका नाही
ॐ शांती ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita
कवितेसाठीकविता या ब्लॉगवर आपले स्वागत आहे.
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

द्वारकेत

द्वारकेत ****** त्याची गाणी दूर दूर  द्वारकेच्या तीरावर  तिची गाणी हुरहुर  हृदयाच्या जळावर  लिहुनिया किती वेळा  पुसतेच ओळ ओळ  पु...