शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६

येवो वावटळ तुझे








मज जाणवतो देवा
तुझ्या मुलुखाचा वारा
ध्वज उरात भगवा
फडफडतो भरारा

काही जाणवते जुने
रंग रूप तया नाही
मन निर्वात होताच
स्पर्श जाणवत राही

गाव सापडेल कधी
मज जरी ठाव नसे
वाट आतली तिथली
मज खुणावत असे

सारे सोडले मागुती
प्रियजनांची मागणी
प्राण घेतले हातात
देह जावू दे वाहुनी

येवो वावटळ तुझे
घर बेचिराख व्हावे
हीच प्रार्थना मनात
माझे अस्तिव हरावे

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
http://Kavitesathikavita.blogspot.in


शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

कळो तुज आता तरी






तसा तर जन्म पुढे
काही वेळ वाहणार
कधीतरी देह मग
काळ असे गिळणार

आला गेला पळ असा
सांग कधी पाहणार
शून्य योजनांचा व्यास
मन कधी मोजणार

भोवताली सांगणारे
सुज्ञ आंधळे हजार  
पाय कुठे ठेवायचे
त्यांना कसे कळणार

सोड वेड्या  हट्ट खुळा
कोण कुणा पुरणार
फुटे घट पाण्यातला
मागे काय उरणार    

कळो तुज आता तरी
शुध्द जाणीव अपार
अन मग गळो तुझा
तूच नसलेला भार


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

उंट रेती अन तो







तीन पाहुणे उंटावरती
नवलाईने बघत रेती
आणि चालला एक पुढे
जयास दुसरी नाही गती  

दूरदूरवर झाड नाही
वरती खालती लाहीलाही
तरीही मजा येतेय किती
नवी दुनिया नवे मनही

आज कुणी तर उद्या कुणी
उंट वाहती त्याच प्रवाही
आणि सैल तुमान पठाणी
शीड सुकाणू होवून दोन्ही

अखेर जगणे असते काय
पसरट उंटाचेच पाय
धसती खचती वाळूमध्ये  
तरी सदैव पुढेच जाय

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...