शनिवार, २८ जून, २०२५

डॉक्टर संजय घोंगडे (निवृत्ती दिना निमित्त)

डॉक्टर संजय घोंगडे (निवृत्ती दिना निमित्त)
**********
फार पूर्वीच्या हिंदी सिनेमात 
नायक असायचा
अगदी आदर्श धीरो दत्त 
शांत हुशार समजूतदार 
स्वाभिमानी व्यवहार चतुर 
तसाच प्रामाणिक हिशोबी अन् उदार 
मित्राला जीव देणारा 
प्रियेला प्रेम देणारा 
मन मिळावू  
नाकासमोर बघून चालणारा
 सर्वांना हवाहवासा वाटणारा 
असा माणूस प्रत्यक्ष जीवनात सापडणे
 फार अवघड पण 
मला तो दिसला सापडला 
आणि माझा मित्र झाला 
तो माणूस म्हणजेच 
डॉक्टर संजय घोंगडे

तसे आम्ही एमबीबीएस चे बॅचमेट 
होस्टेलला एकाच मजल्यावर 
बराच काळ राहिलेलो
पण मित्र व्हायला , 
इंटर्नशिप उजाडावी लागली
कदाचित आमच्या दोघांचे इंट्रोव्हर्टेड स्वभाव आणि काळाचा प्रभाव 
त्याला कारणीभूत असावा 
खरंतर आपण मैत्री करत नसतो 
मित्र धरत नसतो 
मैत्रीचं झाड आपोआप रुजत असते
तिथे अगदी आवडीनिवडी 
सामान नसल्या तरी चालतात 
ते एक हृदयस्थ अंतस्थ नाते असते

मी बीएमसी मध्ये आलो 
तो संजय मुळे च 
त्याने माझा फॉर्म आणला 
माझ्याकडून भरून घेतला 
आणि स्वतः सबमिट ही केला
अन्यथा मला बीएमसी चे
आरोग्य विभाग काय आहे 
हेही माहीत नव्हते 
माझ्या नोकरीचे सारे श्रेय 
मी संजयला देतो.

पण हे तर मैत्रीचे एक 
लहानसे आऊट कम होते 
मला माहित होते अन् माहीतआहे 
हे मैत्रीचे  झाड माझ्यासाठी 
सदैव उभे असणार आहे 
कारणं मैत्रीचा आधार 
जीवनात इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा 
अधिक महत्त्वाचा असतो.
म्हणून ज्याच्या जीवनात अशा 
धीरोदत्त नायकाची इंट्री होते 
त्याच्या जीवनाच्या चित्रपटाला 
एक झळाळी येते 
आणि माझ्या जीवनाला आली आहे 
धन्यवाद संजय फॉर बिईग माय फ्रेंड 

तुझ्या  सेवानिवृत्ती दिनानिमित्त 
तुला आभाळभर शुभेच्छा 
सदैव सुखी समाधानी आनंदी राहा 
तुला दीर्घआयु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 

शुक्रवार, २७ जून, २०२५

जीवन अपघात

जीवन
******
स्वप्न नभीचे होते कालचे 
आज तयाचे भान नाही 

विश्व उद्याचे होते सुखाचे 
पण तयाचे चिन्ह नाही 

जग धावते चक्र चालते 
नभी पांगते अभ्र काही 

परी कुणाला काय कळला 
व्यर्थ  शिणला शोध तो ही 

ये रे धावून घे रे पाहून 
गेल्या निघून दिशा दाही 

भोग विझले योग हरले 
हाती उरले शून्य पाही 

नसे हातात काही विक्रांत 
असे अपघात जीवनही

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 

गुरुवार, २६ जून, २०२५

चाक फिरते

चाक फिरते
*********
चाक फिरते जग चालते  
अव्याहत जे स्थिर असते 

ज्यांनी पाहिले त्यांनी जाणले 
बाकी वाटेवर अंध चालले 

वाट क्षणांची दोन पदांची 
चालल्यावाचून संपायची 

कुणी भुंकतो कुणी चावतो 
कुणी दुःखावर दवा लावतो 

जन्म जितुके भाग्य तितुके 
फिरताच वारा जग परके 

सत्य कळते भय हरवते 
तळहातावरी रेष उमटते 
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 

मंगळवार, २४ जून, २०२५

दत्त दिगंबर

दत्त दिगंबर
*********
संसारी बांधलेला
पोटास विकलेला
तरी दिगंबरास
हृदयी मी धरिला ॥

शब्दात सजविला 
भावात मांडला
दत्त करुणाकर 
माझा मी मानला ॥

नामात बांधला 
ध्यानात साठवला 
दत्त  स्मरणगामी 
मनी मी प्रतिष्ठीला ॥

दिशा पांघरला 
पिसा उधळला
दत्त अवधूत 
चित्ती मी ठेवला ॥

कुणी सांभाळला
धरूनी ठेवला
दत्त सर्वव्यापी 
कुणाला कळला ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 



सोमवार, २३ जून, २०२५

आळंदीत

आळंदीत
*******
माझ्या आळंदीचा थाट किती वर्णावा शब्दात 
उभे आडवे चैतन्य लोटे सोनेरी लाटात ॥

उभे पदोपदी नम्र दूत वैकुंठ धामीचे 
घेती एकेक वेचून सल भक्तांच्या मनीचे ॥

दृष्य अदृष्य कृपाळ संत मांदियाळी थोर 
तया दृष्टीत वाहतो प्रेम कृपेचा सागर ॥

नाम मोत्यांचे भांडार नच सरते अपार 
शत पिढ्या जोडोनिया घ्यावे इतुके भांगार ॥

माय धन्य धन्य झालो तुझ्या नगरीत आलो 
वारी तुझिया दारीची सुख सुखाचे पातलो ॥

शब्द ज्ञानेश्वर फक्त माझ्या मनात उरावा 
जन्म प्रकाशाचा खांब देहासहित या व्हावा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 

रविवार, २२ जून, २०२५

युद्ध अटळ आहेत

युद्ध अटळ आहेत  
*****
युद्ध अटळ आहेत 
विध्वंस ही अटळ आहे 
सृजन पालन मरण हे चक्र 
सदैव चालणार आहे 
शहर नष्ट होतात 
संस्कृती लयास जातात 
काळरुपी महाप्रलयात 
राष्ट्र बेचिराख होतात 

निसर्गाच्या दृष्टीने माणसांची शहर 
आणि मुंग्यांची वारूळ 
दोन्ही सारखीच असतात 
मुंग्या ही लढतात एकमेकांशी 
आणि काबीज करतात वारूळ 
मुंग्याही बळी जातात, कैदी होतात 
गुलाम केल्या जातात किंवा 
मारून टाकल्या जातात वापरून
दुसऱ्या वारुळातील प्रजातींकडून 

हे वैर हा द्वेष ही असूया माणसाची 
ही जगत्जेता होण्याची 
आकांक्षा माणसाची
हीच तर शस्त्रे आहेत 
काळात्म्याची विनाशाची 
अन्यथा समतोल कसा साधणार 
या अफाट जनसंख्या वाढीचा 
या नाश पावणाऱ्या जंगलाचा 
या असंख्य जीवांना 
नष्ट करणाऱ्या प्रदूषणाचा 
या स्वार्थलोलूप हव्यासाचा 

कदाचित माणसांना मारणारे 
हे माणूस यंत्र 
निसर्गानेच नियोजित केले असावे
हि यादवी माणसा माणसातील, 
धर्माची राष्ट्राची भाषेची 
शस्त्रे घेऊन उभी आहे

विनाश तर होणारच 
हे अलिखित प्रारब्ध असते
कारण मरणातूनच पुन्हा 
सृजन होत असते 
हे  चक्र सदैव असेच चालू राहते
पण का आणि कुणासाठी 
हे प्रश्न ज्याला पडतात 
त्यालाच ते सोडवावे लागतात 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 

शनिवार, २१ जून, २०२५

शांतीची आस

शांतीची आस
************
जोवर साप ते भूमीवरती 
तोवर येथे कुठली शांती 
विश्वकुटुंब जे न मानती 
फक्त बावटा धरून ठेवती 

उरात सदैव अंधभक्ती 
काय कुणाचे रे ते असती 
जे न मानती तया मारती 
तोडून फोडून वर हसती 

किती शिकले थोर जाहले 
बीज अंतरी तेच राहिले 
आत बाहेर विष लावले 
सैतानाचे ते रूप सजले 

जोवर डोक्यात बाड कोंबले 
माथे ते रे असे बिघडले 
शांती नकोच वा उत्कर्ष 
झेंड्यापायी केवळ संघर्ष

गंगा सोडूनी कुण्या गटारात 
अगा जे की गेले वाहत
रे तया कधी का कळते 
अत्तरात काय सुख असते

ती शांतीची आस व्यर्थची 
शस्त्रे तत्पर जेथे वधाची 
मरे माणूस कितीक मेले 
परी ते कुठली पर्वा नसले

श्रद्धेने त्या तांडव केले 
विश्व ढवळून नरक जाहले
कोण थोपवी यास आता 
विश्व शोधते नव्या प्रेषिता
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 




परिक्रमा

परिक्रमा ******* गावा गावात फिरत आहे  अन्नक्षेत्री जेवत आहे अन् अर्थ या जीवनाचा  माईकडे मागत आहे  प्रचंड पाणी प्रवाहाचे  नितळ नि...