गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१८

निरोप समारंभी





या तीन वर्षांत 
गेलो आहे तीन पर्वातून 
पहिले पर्व सोपे होते 
जाणणे पाहणे शिकणे
अन व्यक्ती ओळखणे 
हेच मुख्य काम होते 
स्नेह मैत्री आदर यांचा
त्यात सुगंध होता
खरंच ते दिवस 
पाखरांचे पंख लावून आले होते 

दुसरे पर्व जबाबदारीचे होते 
खरेतर डोक्यावर आलेले ते ओझे होते
तरीही त्यात एक उलगडणे होते 
आपण आपल्यालाच पाहणे होते 
स्वत: मर्यादांचे बाहुबल जोखले होते 
पण तरीही ते एक वरवरचे
एकटेपणाचे रूक्ष जगणे होते 
माणसात रमणारे अन् मिसळणारे हे मन
अधिकाराने जखडले होते
म्हणून 
टाकतात ते ओझे वाटले
प्रश्न सुटले आहेत
पण ते तसे घडले नाही 

तिसरे पर्व सुरू झाले 
तेव्हा जगणे नकोसे झाले होते 
जिथे फुले वेचली 
तिथे गोवर्‍या  वेचने नशिबी आले होते 
म्हटले तर चुकलेच होते 
लायकी असूनही स्वतःला नाकारले होते 
मनशांतीसाठी मध्यम मार्गावर 
पाऊल ठेवले होते
पण पदच्युत राजाचे ते
अपमानित मांडलिक जिणे  होते 
बंद करून झाकण प्रज्ञेचे
निरर्थक मान हलवणे होते 
अन् प्रत्येक दिवस हेच एक
ओझे झाले होते 

अखेर बदलाचे शुभ आशीर्वाद
घेऊन आलेला मित्र
शुभशकुनांचा कारणही झाला 
अन् या तीन अंकी नाटकाचा अंत झाला

या तीन पर्वात 
मी काय कमावले 
ते पाहू लागलो तेव्हा दिसले 
माझ्यासोबत फक्त प्रेम उरले आहे
इवलीसी कटुताही विरून गेली आहे 
सहकारी आणि सोबत यांनी 
दिलेल्या स्नेहाचा प्रेमाचा
आधाराचा अन् तृप्तीचा 
एक ठेवा हृदयात उरला आहे 
परफेक्ट कुणीच नसतो
मीही नव्हतो   
तरीही ते एक शुभंकर सहजीवन होते 
कधी पुनवेच्या चांदण्यात भिजणे होते 
कधी अवसेच्या आकाशगंगेत हरवणे होते 
जीवनातील गाठीभेटी सुखदु:खे देणेघेणे
पूर्वजन्माचे ऋणानुबंध असतात
कधी सुरू होतात 
कधी संपतात 
कुणालाही न कळते
पण हे जगणे सुंदर होते 
एवढे निश्चित !!

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


सोमवार, १० सप्टेंबर, २०१८

आजची नवी



आजची नवी
*********

तुझ्या उधार शब्दांना
काही आधार नव्हता
तू बोलली जरी काही
गंध आसवांचा होता

घेऊन साथ क्षणांची
जगते कोण कशाला
तू सुखा विटूनी का हा
घेतला विषाचा प्याला

क्षण सारेच वेळकाढू
निष्क्रिय निरुद्देश पंगू
जगण्याच्या निरस वाटा
म्हणालीस कुणाला सांगु

आगीविन का जळते
तेजात तमाला स्मरते
घे चुंबन ओठांनी तू
फुल हाती दरवळते

म्हणेल जन जे काही
ते ऐकणेच असते
उतरता रणी कुणी
घाव साहणे असते

दाटल्या कणांचा आवेग
अभ्रां नच मोडवतो
कोसळून शतधारा
अस्तित्व शुन्य तो होतो 

ही जगण्याची रे रीत
तुज सांगाया का हवी
सांडून कालच्या क्षणा
हो पुन्हा आजची नवी

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, ८ सप्टेंबर, २०१८

गुंतू नये


गुंतू नये
*****

एवढे पण गुंतू नये
असे कधी कुणात
की फास होईल बंधन
आपल्याच गळ्यात

जीवनाच्या पैलतीरावर
पोहचता पाय
सांग मागे वळून
पुन्हा जाता येते काय

मनाची ही नगरी
असे विलोभनीय जरी
वर्तमानाच्या आगीत
क्षणात जळून जाते खरी

हा हट्ट बरा नव्हे
उगा धावणे अंधारात
हा उतार ही वाट ,
जाते खोल डोहात

सावर ग सांभाळ सखी
कळ जप काळजात
रमुनिया जाई तुझ्या
उबदार घरट्यात


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१८

दत्त कृपा


दत्त कृपा

दत्त कृपेची साऊली 
दत्त मायेची माऊली 
दत्त नयनी भरली 
मज करूणा दिसली 

दत्त जिवांचा विसावा 
दत्त शांतीचा पुतळा 
दत्त भक्त मनावर 
मेघ कोसळे सावळा 

दत्त मायाळू कठोर 
नीट नेई पथावर 
घेई प्रेमाने जवळ 
कोडे सोडवी दुस्तर 

एका दत्ताला स्मरावे 
जीणे तयास वहावे
धन मान यशाचे का 
उगा देव्हारे माजावे 

विक्रांत दत्ताला शरण 
जाणे जन्माचे कारण 
दत्त प्रेमाने मिळते 
दत्ता प्रेमाचे अंगण 


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, ३ सप्टेंबर, २०१८

आनंदअनुकार



आनंद अनुकार

भरून आलेल्या
गच्च आभाळातील
चार थेंब आहेत
माझ्या कविता

गरज नाही त्यांनी
कुण्या झाडांची
कुण्या मानवाची
अथवा प्राण्यांची
तहान भागवायची

वातावरणातील
सूक्ष्म जलकणिकांचे
इवलेसे संघटन होऊन
ओघळते जीवन
त्यांचे ते होणे
ते अवतरणे
अन् हरवणे
किती अभूतपूर्व असते

अन् शेवटी
अशा हजारो शब्दात
लाखो ओळीत
स्वत:ला सोपवून देणे
निरासक्त निर्लेप होत :
ज्ञानदेवांच्या मराठीशी
तुकोबांच्या मातीशी
स्वतःचे नाते सांगत
हा माझ्यात उमटणारा
सर्वात मोठा
आनंदाचा अनुकार आहे


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, २ सप्टेंबर, २०१८

सावली




सावली
********

येते आकाश भरून
भय मनात दाटून
दत्त स्मृतिची सावली
मन घेतसे ओढून

तोच घडवितो सारे
जन्म जीवन मरण
माझ्या श्वासाचे गणित
दिले त्यांनीच आखून

कसे सांगू मी तयाला
काही पुढती ढकल
गाठ प्रारब्धाची अन   
थोडी तरी रे उकल

कृपा एवढीच मागे
भेट द्यावी लवकर
सार्‍या मागण्यांचा अन
अंत एकदाच कर

मग यावीत येणारी  
सुख दु:खाची वादळे
तया प्रेमात स्वीकार
दारी चांदणे निखारे

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

मोहात मासोळी



मोहात मासोळी
*********

मोहाच्या डोहात
उनाड मासोळी
खेळते आंधळी
कोशंबीर 

धावते थांबते
माघारी फिरते
गळास जाणते
नाकारून

रुपेरी नाजूक
सुरेख सुंदर
होऊन उदार
घाबरट

जाऊन खोलात
बसते रडत
अमिषा स्मरत
आपुलिया

कोसते देवाला
कोसते मनाला
कशाला आणला
प्रसंग हा

आमिषा ठाव ना
आमिष आहे तो
दोरा न जाणतो
अदृष्य श्या

तरंगी डोलतो
रंगांत खुलतो
गंधात झिंगतो
उगाचच

मासोळी साठीच 
जन्म की त्यास
आणखी कशास
जाणतो ना

खेळ हा चालला
जीवास गाठतो
आणिक गिळतो
पुन्हा पुन्हा

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...