बुधवार, २१ जून, २०२३

पाहते पाहणे

पाहणे पाहते
**********
पाहणे पाहते सांडूनी निरुते 
पाहीलिया त्याते 
तूचि होशी ॥
तोचि तू आपण तत्व ते तू जाण 
 न लगे साधन 
आन काही ॥
भानुबिंबे विन भासले तम 
ज्ञानदेव वर्म 
अनुवादला ॥
********
कुठलीही गोष्ट पाहायची असेल तर त्यामध्ये मी पाहायची वस्तू तो पाहणारा आणि पाहण्याची क्रिया ही तीन गोष्टी लागतात 
परंतु ज्ञानदेव महाराज म्हणतात की पाहणे आणि पाहते सांडून पूर्णपणे तू जर त्याला पाहिले तर तो तूच होशील.
परमात्मा तत्व पाहायचे असेल तर त्या ठिकाणी हा पाहणारा हरवून जायला हवा. पाहणे सुद्धा नष्ट व्हायला हवे .ज्ञान आणि ज्ञाता याचा निरास झाला पाहिजे.
 आणि एकदा तुला तुझे स्वरूप म्हणजे  तो तूच आहे हे कळले की मग आणखीन काही साधन करायची गरज नाही 
कारण जोपर्यंत भानुबिंब म्हणजे सूर्य नसतो तोवरच अंधार असतो भानुबिंब उगवल्यावर अंधार नावाची गोष्ट ही अस्तित्वात नसते.
 त्याप्रमाणे परमात्मा सूर्य ,परमात्मा रूपी ज्ञानाचा उदय झाल्यावरती इतर साऱ्या अहंकारादी वृत्ती त्यावर आधारलेले ज्ञान याचा आपोआपच नाश होतो 
हे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी उलगडून सांगत आहेत.

सामान्य माणसाला ही गोष्ट अशक्यप्राय वाटते कारण तसा प्रयत्न करू केल्यास त्याला ते साध्य होत नाही किंवा नेमके काय आणि कसे करायचे हेच कळत नाही. त्यामुळे महाराजांचा हा अभंग त्याला साधनेच्या अंगाने पाहता दुर्बोध वाटू शकतो परंतु नीट पाहिले असता सर्व साधनांचे सार या अभंगात आले आहे. अगदी सुरुवातीला ध्यानामध्ये बसल्यावर, शांतपणे बसल्यावर आपण आपले डोळे मिटल्यावर पाहणे सुरू होते अर्थात हे पाहणे आतमधले असते. तिथे स्मृती म्हणजे आठवणी विचार शब्द चित्र या विविध प्रकाराने मन डोळ्यासमोर नाचू लागते. तिथे आत मध्ये पाहणे चालू राहते आणि पाहणारा त्यामध्ये हरवून जातो म्हणजे एकरूप होतो. तर या ठिकाणी सर्वप्रथम पाहणे आणि पाहणारा या मध्ये एक दरी,भेद निर्माण होणे आवश्यक असते. म्हणजे पाहणारा हा त्या पाहण्यामध्ये रस न घेणारा त्यात न रमणारा असा  उपरा किंवा दृष्टा झाला की ती पाहण्याची क्रिया संपूर्णतः बदलते मग ते निखळ पाहणे चालू राहते. त्या पाहण्यात पाहणारा अजिबात स्वतःला विरघळू देत नाही मग ते पाहणे हळूहळू निरस होत जाते. त्याच्या लाटा कमी होऊ लागतात. आणि फक्त पाहणारा शिल्लक उरतो. पाहणे आणि पाहणारा आहे तसे पाहता वेगळे नसतात. त्यामुळे पाहणारा हा पाहणे नसताना च्या अवस्थेत गेल्यावरती जे स्वरूप असते ते आत्मस्वरूपच असते 
त्या ठिकाणी मी पण नसते केवळ शुद्ध स्वरूप अस्तित्वात असते तेच परमात्मा तत्व.
सूर्य उगवल्यानंतर ज्याप्रमाणे अंधाराचा नाश आपोआपच होतो किंबहुना सूर्याचे अस्तित्व म्हणजेच तमाचा निरास .त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय झाल्यावर सर्व ज्ञान अज्ञान विरून जाते हे ज्ञानेश्वर महाराज या अभंगांमध्ये आपल्याला उलगडून सांगत आहेत.

विक्रांत प्रभाकर तिकोणे.

सोमवार, १९ जून, २०२३

गिरनार वारी

गिरनार वारी
**********
नसूनही गर्दी हाकलती साधू 
गिरणार बंधू शिखरचे ॥१
कुणी एक नवा फोटो काढू जाता 
नरकाच्या वाटा तया दावी ॥२
कोणी धमकावे फेकीन तो फोन 
किंवा आपटेन धरूनिया ॥३
कोणा निळे शाप कळल्या वाचून 
विचारा तो दीन होय जीवे ॥४
सांगण्या कारण जावे सांभाळून 
अपेक्षा सोडून सौजन्याची ॥५
क्षणभर पहा दत्त चरणाला 
श्रम वेचलेला विसरून ॥६
होऊन चिवट हळू सरकत 
दत्त निरखत पुढे चला ॥७
बोलू द्या साधूला आणि शिपायाला 
कान त्या शब्दाला देऊ नका ॥७
जिथे असे देव तिथेच बडवे 
आम्हा हे तो ठावे सालो साल ॥८
ढळल्या वाचून गिरणार भक्ती 
जावे वहिवाटी  तेथचिया ॥९
नाही असे नाही खंतावतो जीव 
परी राही भाव अभंग तो ॥१०
बोलाव रे दत्ता गिरणार गावा 
क्षणभर जीवा भेटी देई ॥११
विक्रांत संसारी कामी क्रोधी जरी 
तुझ्या पायावरी सरो वारी ॥१२
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

रविवार, १८ जून, २०२३

पाऊस पहिला

पाऊस पहिला
************
पाऊस पहिला नभात दाटला 
मज आठवला गाव चिमुकला ॥

त्या गावामधला तो पथ इवला 
जलमय झाला गंध विखुरला ॥

पथावर त्या ती होती चालली 
दप्तर पेलत वर छत्री धरली ॥

लाल रिबीनी वर घट्ट वेणी
भालावर अन गंध रेखुनी ॥

भिरभिरणारे ते टपोर डोळे 
गर्द काळे अन तेज दाटले ॥

तिला दिसावे वा तिने पहावे 
केली धडपड ती मलाच ठावे ॥

हाका मारणे कुणा मोठ्याने 
डबक्यावरून वा उडी मारणे ॥

प्रताप असले बहुत मी केले 
कुणासाठी हे तिजला कळले ॥

कौतुक भरले डोळ्यामधले 
मग मजवर होते बरसले ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘




Not my world


Not my world
*****************

As days are passing
I am becoming 
More and more Unfit  
to the world 
and the work

Corruption
Insensitivity
Reluctance to work 
Laziness 
Arrogance 
Dirty Politics 

Is what 
Most of 
surrounding is

Where you get tools
but no power 
you get place 
but no peace
You get collogue
But no cooperation
And you have to live
with fury and flood
wet and cold

There are fools
around you 
You have to write eassy 
to get rid of them 
And mostly 
You get defeated 
by them .

Bosses are there
to save their skin 
social worker 
cum politician
to achieve their aim
ambitions and dreams.

I think
For this 
One need to be 
become Nut 
Which I can not .
So accepting 
my defeat .
and planning exist.

I think this is not my world.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘





शुक्रवार, १६ जून, २०२३

तू

तू
*****
तू चांदण्याचे गाणे 
तू मनीचे तराणे 
तू जोंधळ्याचे दाणे
टपोर ग ॥
तू आंब्याचा मोहर 
तू पिकलेले बोर 
तू अपार मधुर 
करवंद ॥
तू पायवाट लाल 
जाते सांभाळत तोल 
तुझ्या चढणीचा डौल  
अवखळ ॥
तू भिजलेले झाड 
तू भरलेला आड 
तू तुफानाचे द्वाड 
वारे तेज ॥
तू जीवनाची ओल
तू काळजात खोल 
तू मृदुल मवाळ
शब्द माझे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

गुरुवार, १५ जून, २०२३

अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ

अधिक देखणे तरी निरंजन पाहणे  भावार्थ
********************************
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय ।
या जगात जे पहायचे ते पाहिले, जे जाणायचे ते जाणले, आता हे जग आणि त्याच्या पलीकडे काय आहे.तर हे जे पाहायचे आहे ते काय आहे? तर ते निरंजन आहे !  निरंजन म्हणजे ज्याला काजळी नाही असे तत्व प्रकाशमान तेजस्वी ज्ञानस्वरूप किंवा आपले निज स्वरूप ते हे निरंजन !त्याला आपण ज्ञान असेही म्हणू शकतो, तर ते पहायचे मनी आले आहे
त्यासाठी ज्ञानदेव योगीराज श्री निवृत्ती देवांना विनवणी करीत आहेत 

देह बळी देऊनी साधीली म्यां साधनी तेणे समाधान मज जोडले वो माय ।
ज्ञानदेव महाराज म्हणत आहेत की हे ज्ञान ही स्थिती प्राप्त होण्यासाठी मी देहबळी दिला आहे. देह बळी देणे म्हणजे देहात्म भावाचा बळी देणे. मी शरीर आहे, हा भाव सोडणे ,सुटणे देह बळी देणे म्हणजे गुरु सेवा करता करता सेवेचा परमावधी गाठणे, देह बळी देणे म्हणजे ममत्व सुटणे. तर हे असे साधन मी केले आहे असे महाराज सांगत आहेत आणि ते पुढे म्हणतात की त्यामुळे मला अतिव समाधान लाभले आहे समाधान अशी  स्थिती आहे की जिथे हवे पणाचा अंत झालेला असतो आणि नको पणही अस्तित्वात नसते. आपले अस्तित्व आणि त्या भोवती जी परिस्थिती असते त्यात मन निवांत बसलेले असते ,निवांत झालेले असते. तो निवांतपणा कशानेही ढवळत नाही.

अनंगपण फिटले माया छंदा साठवले सकळ देखिले आत्मस्वरूप वो माय ।
महाराज पुढे म्हणतात की या साधनेमुळे माया छंदात साठवलेले माझे अनंगपणा सुटले 
अनंग म्हणजे ज्याला अंग नाही असा. अनंग म्हणजे कामदेवही, म्हणजेच आपल्या अनंत  कामना , वासना , इच्छा हे देह नसूनही आपल्यात आहेत धन कीर्ती यांची हाव हे अनंगाचे विस्तारित रूप आहे आणि या अनंग पणाचा उद्भव मायेमुळे होतो. अर्थात मायेच्या नादी लागल्यामुळे होतो. ते अनंगपण मायेच्या छंदासकट सुटले, त्यामुळे मला आत्मरूपाचे संपूर्ण दर्शन झाले,ते सकळा ठाई ते वसलेले दिसले

चंदन जेवी भरला अस्वस्थ फुलला तैसा म्या
देखिला निराकार वो माय ।
ज्ञानदेव महाराज म्हणतात मी तो निराकार पाहिला निराकार आणि पाहणे हे बोलणेच विरुद्धार्थी आहे. तर मग तो मी पाहिला हे कसे? तर जसा चंदन जसा सुगंधाने भरून जातो आणि अश्वस्थ पानांनी भरून जातो तसा मी हा निराकार पाहिला आहे. चंदनात चंदनाचा गंध ओतप्रोत भरतो, कणकणात घमघमात सुटतो,त्याच्यामधला तो गंध तो फक्त अनुभवतो. अश्वस्थ जेव्हा हिरव्या कोवळ्या पानांनी बहरून येतो ,पान नि पान लसलसत असते, झळाळत असते ,चैतन्याची पखरण करत असते, त्याच्याकडे पाहताना देहभान उरत नाही त्याचे ते बहरणे त्याच्या नकळत होते. व तो असतो ते केवळ फुलणे होऊन असतो, ते फक्त अनुभवणे असते. तसे हे निराकार पाहणे, हे फक्त अनुभवणे आहे आणि हे ज्ञान झाल्यावर हा अनुभव आल्यावर पुढे. .

पुरे पुरे आता प्रपंच पाहणे निजानंदी राहणे स्वरूपी वो माये ।
मनाची अशी स्थिती होते व ते मन म्हणते की आता पुरे हे जग , हा प्रपंच, या जगाचे ज्ञान, या जगाचा अनुभव, जणू त्याचा मनाला वीट येतो. ते अर्थशून्य वाटते. तो जो निजानंद आहे तो जो आत्मस्वरूपाचा आनंद आहे त्यातच कायम बुडून राहावे ही मनाची अवस्था होते.

ऐसा ज्ञानसागर रखुमादेवीवरु विठ्ठली निर्धारू म्या देखिला वो माय ।
ज्ञानदेवांना हा जो अनुभव झाला आहे, तो निर्गुण निराकाराचा ,चैतन्याचा ,परब्रम्हाचा आहे .परंतु ज्ञानदेव महाराज त्या ज्ञानाला ,सगुणात आणत आहेत आणि निर्धारपूर्वक सांगत आहेत , तो मी पाहिलेला ,जाणलेला ज्ञानसागर म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून रखुमादेवीवर विठ्ठलच आहे.

भावार्थ.
डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे

बुधवार, १४ जून, २०२३

वाम मार्ग

वाममार्ग
*******
दोनचार या पैशासाठी ईमान विकू नका कुणी
पचेल तोवर पचेलही मग घाला घालीन कुणी ॥

चोरावरती मोर होऊनी नका करू आत्मवंचना फेडावे ते लागेल कधी त्यातून सुटका नच कुणा ॥

कमवायला वरचा पैसा अधिकारीही बनतो कुणी त्याहून प्रशस्त राजमार्ग आक्रमितो राजकारणी ॥

हा पैसा जनता नि देशाचा कुण्या इमानी हाताचा 
काढून घास घासा मधला वाटा दिधला सरकारचा

चवली त्यातली खाऊ नका नरक द्वार उघडू नका 
सांगे कळकळीने विक्रांत वाम मार्गास लागू नका ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...