सोमवार, ३ फेब्रुवारी, २०१४

तमातून तमाकडे



 

तमातून निघे
तमाकडे गाडे
प्रकाश तुकडे
पांघरुनी ||

जगण्याचा भार
शीर्ण मनावर
सर्वांगी नकार
दाटलेला ||

होते अगोदर
काय ते नंतर
भयाने अंतर
काजळले ||

फुटक्या प्रार्थना
अतृप्त याचना
सजवुनी मना
निरर्थक ||

असेल देहांत
जगताचा अंत
अजीर्ण वेदांत
होत असे ||

विक्रांत प्रभाकर http://kavitesathikavita.blogspot.in/




 
 

रविवार, २ फेब्रुवारी, २०१४

मंगळसूत्र तुटता

सगळीच सूत्रे होती तुटली
नाती विटून विरून गेली
मंगळसूत्र पण तुटता अचानक
कावरीबावरी ती होती झाली
क्वचित हाती तिने घेतला
नोझल स्पँनर शोधून काढला
खटपट करून कडी निसटली
जोडण्याचा अन यत्न केला
अश्या कामात धावणारा तो
लांबून फक्त पाहत होता
आता जोडाजोडी करण्यात
त्याला मुळी इंटरेस्ट नव्हता
प्रयत्नांती ते नच जुळले
वैतागून मग वदली ती
सोंगढोंग या जगासाठी
उगा करावी लागती ही
 
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
 

शुक्रवार, ३१ जानेवारी, २०१४

डॉ.वाघमारे



डॉ .वाघमारे आणि डॉ.साळी या डॉ   मित्रांनी आज व्ही, आर . एस .घेतली
त्या निमित्ताने


तसे हे रुग्नालयही
एक रंगमंच आहे
ज्यात सारे कर्मचारी
आपापली भुमिका
चोख बजावतात

आपल्या वाट्याला
आलेल्या भूमिकेने
रंगमंच सुंदर करतात
अस्तित्वाने
जान आणतात
या सेवाभावी कामात
कुणी इथे काही आठवडे, महिने
वा काही वर्ष राहतात
तर कुणी वर्षोनुवर्षे टिकतात
इथल्या अस्तित्वाचा
अविभाज्य होतात
जुनाट वटवृक्षागत


थोडे जोकर थोडे व्हिलन
थोडी राजकारण
थोडी बलिदान
इथेही घडतात
काही रडणे काही हसणे
काही रुसणे काही फसणे 
रंगमंचाचे नियम असतात 

 
पण मुख्य भूनिका
वाट्याला येणे
हे खरोखर भाग्य असते
अर्थात ते एक
काटेरी सिंहासन असते
कारण तिथे बसल्यावर
आपण ज्यांना आपले मानले
ते ही परके होवून जातात
कालचे मित्र शत्रू होतात
आणि फोलपण त्या
सही शिक्याचे
मनी ठसवून जातात


खरच  ही भूमिका वठवणे
खूपच अवघड असते

संवेदनशील स्वाभिमानी लोकांसाठी
ती एक शिक्षाच असते
मग ते मनस्वी राजे ठरवतात
झुगारून देणे
तो काटेरी मुकुट
कायमचाच
आणि धरतात आपला मार्ग
मुक्त कलंदर जगण्याचा

 
मित्र हो आपल्या समोर
आपले असेच कलंदर मित्र
बसले आहेत
उतरवून आपला काटेरी मुकुट
ते आपल्यात आले आहेत
आपण त्यांना निरोप
द्यायला नाही तर त्यांचे
स्वागत करायला आलो आहोत

wel-come back मित्रा !!

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

डॉ. साळी

                                                                  डॉ अरुण साळी

डॉ .वाघमारे आणि डॉ.साळी या डॉ.  मित्रांनी आज व्ही, आर . एस .घेतली
त्या निमित्ताने

 डॉ. साळी ..

माझ्या जीवन रसिक मित्रा
जवळ जवळ १२ वर्ष झाली
आपल्या पहिल्या भेटीला
तेव्हा तू मला वाचवले होते
उगाचच सणकल्या
बॉसच्या तावडीतून
कामाच्या पहिल्याच दिवशी...
तेव्हापासून
तुझा प्रत्येक सल्ला
मला वाचवत होता
मार्ग दाखवत होता
सहज बोलता बोलता
मला खूप काही देत होता
या जीवनात अनेक लोक भेटले
त्याच्या जगण्याचे
अनेक स्तर होते ..

काही वरवरचे उथळ
काही खाना पिना

मजा करना या पंथाचे
तर काही मध्यम
घरादाराच्या चाकोरीत

गरगर फिरणारे 
तर काही खोलवर
जीवनाच्या गाभ्याला भिडणारे
आनंदाचा सुगंध

दशदिशात पसरवणारे
सुखाच्या छोट्या छोट्या
क्षणातून जीवन जगणारे...
असे जीवन जगणारा
क्वचित कुणी असतो
तो तू आह्र्स मित्रा
असे मी निश्चितपणे सांगू शकतो
तुझ्या सोबत असतांना
कंटाळा कधीही खोलीमध्ये
प्रवेश करू शकला नव्हता
तुझ्या व्यक्तिमत्वाचा
एवढा प्रभाव होता ..
मला माहित आहे
जीवनावरील तुझ्या अदम्य प्रेमामुळेच
कालपुरुषा ला ही गुंगारा देवून
आलास तू सहज पणे फसवून
त्या तुझ्या खोचक खट्याळ
बोलण्यात गुरफटून ...
तुझ्या संगतीची उणीव
नेहमीच भासत राहील मित्रा .

शेवटी
पंजाबीत म्हणतात तसे, तेवढेच
म्हणतो
तुसि ग्रेट हो पापे !!!!


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
 

बुधवार, २९ जानेवारी, २०१४

लहानश्या सखीस



या वळणावर जीवनाच्या
संभ्रमित झालेली ती
त्याच्यासाठी वाटेवर
डोळे लावून बसली होती

इथे तिथे उगाच मना
रिझवू पाहत होती
आशा निराशा विचार वादळ
बाटलीत बंद करू पाहत होती

 
तिचेच होते सारे पण
तिला मिळत नव्हते
रुढीच्या दृढ विळख्यात
स्वप्न  जखडले होते

 
शस्त्र त्याच्या हाती होते
पथ त्याला माहित होते
का थरथरती हात त्याचे
तिला कळत नव्हते

 
दूरदूरवर घरापासून
जगाशी ती  लढत होती
त्याच्या स्मृतीत मग्न
तरीही एकटीच होती

माझे शब्द तिच्या साठी
बळ एकवटत होते
लहानश्या सखीस माझ्या
लढ म्हणत होते


विक्रांत प्रभाकर http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, २६ जानेवारी, २०१४

मैत्रीचा मृत्यू



धार धार शस्त्राने
फांदी तुटावी तसे
मित्र तुटतात क्षणात 
एकाच घावात
पैशाच्या आसक्तीने
स्त्रीच्या स्वमित्वाने
कामाच्या वाटणीने
घडतात वाग्युद्ध
शब्दाने शब्द वाढत जातो
अन डिवचलेला अहंकार
सहज विसरुन जातो
त्यागाचे  प्रेमाचे
हास्याचे  सुखाचे
अन सहवासाचे
विलक्षण क्षण ..
साऱ्या स्मृती कालच्या
जळून जातात क्रोधाच्या जाळात
मैत्रीच्या भूमीत रुजलेले वैर
फारच संहारक असते
कारण मैत्रीचा मृत्यू
हा कदाचित
आपला स्वत:चाच मृत्यू असतो
त्यामुळे
ते प्रेम जेव्हा मरते
तेव्हा सारी जमीन
नापीक झालेली असते


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

पाणी भरत आहे (नर्मदाकाठच्या कविता )



पाणी भरत आहे
तट बुजत आहेत
गावोगावचे देखणे
घाट बुडत आहेत

भांडून माणसे
थकली आहेत
रडून माणसे
थकली आहेत

हाती पडले ते
घेवून माणसे
दूरवर जावून
वसली आहेत

गाव पुन्हा
दिसणार नाही
शेत कधी ही
फुलणार नाही

मी खेळलो
ते अंगण शाळा
आता इथे
उरणार नाही

डोळ्यात दाटला
पूर द्वारकेतला 
आता कधीच
आटणार नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

परिक्रमा

परिक्रमा ******* गावा गावात फिरत आहे  अन्नक्षेत्री जेवत आहे अन् अर्थ या जीवनाचा  माईकडे मागत आहे  प्रचंड पाणी प्रवाहाचे  नितळ नि...