शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१३

साक्षीचे आकाश..




श्वास प्रश्वासाच्या
आरोह अवरोहाला
पाहता पहाता मी
सावध होत गेलो
मनाची बेलगाम 
धाव सजग होवून
न्याहाळू लागलो
पाहतांना त्यात कधी
वाहून जावू लागलो
वाहने लक्षात येताच
पुन्हा मनापासून
वेगळे होवू लागलो
साक्षीच्या अथांग
निळ्या आकाशात
विहार करू लागलो
दृष्ट्त्वाच्या शिखरावर
सावध बसू लागलो
होता होता असे काही
शून्याच्या स्पर्शाचे
संकेत आकळू लागलो .

“अरे हेच तर मिळवायचे होते
मग आजवर टाळले का ?
मीच मला विचारले .
अन मीच उत्तर मला दिले
कारण त्यात
चुकायचे भय होते
स्वत:च स्वत:ला नित्य
सांभाळायचे होते
अन मला तर
सुरक्षित नीट पोहचायचे होते
नक्कीच्या आश्वासनाचे
तिकीट पाहिजे होते

कृष्णाने सांगितलेले कळले
बुद्धाने सांगितलेले कळले
कबीर ज्ञानेश्वर तर
तोंडपाठ झाले होते
तरीही मनाला सुप्त ते
एक आकर्षण होते
साक्षात सद्गुरू कृपेचे
लाघव हवे होते
हात धरून त्यांचा
मज चालायचे होते
जन्मोजन्मीचे संस्कार
सहज का जाणार होते

मध्यान उलटून गेली आहे
नजर जाईल तिथवर
दूर दूरवर केवळ
रस्ताच रस्ता आहे
खूप थांबलो..
खूप थबकलो..
आता धावणे भाग आहे
रस्ता तर कळला आहे
साऱ्या अपेक्षा सोडून
सारे आधार मोडून
स्वत:च्या पायावर
फक्त विश्वास ठेवून
क्षितिजाच्या अंतापर्यंत ...
आता जाणे आहे .

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आरसा

आरसा ****** तुझिया डोळ्यांनी मीच मला पाहतो वादळ संवेदनांचे कणाकणात वाहतो  कविता तुझ्यावरच्या  लिहून खुश होतो  मी तुला खुश करतो क...